आजच्या इंटरनेटच्या युगात विजेशिवाय जीवन जगण्याची कल्पना करणे अशक्य आहे. तास-दोन तासांचे भारनियमनही आपण सहन करू शकत नाही, मात्र नागपूरपासून अवघ्या ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या किरंगीसर्रा या गावाने विजेसाठी तब्बल ६६ वर्षे तपस्या केली आहे. किरंगीसर्रा गावातील ६३ कुटुंबातल्या ३४० नागरिकांनी पहिल्यांदाच विजेचा प्रकाश अनुभवला. महावितरणे गाव तेथे वीज ही संकल्पना रुजवली आहे. नैसर्गिक अडचणींमुळे काही ठिकाणी अद्यापही वीज पोहचली नव्हती. यात पारशिवनीपासून ५० किलोमीटर अंतरावर किरंगीसर्रा हे एक गाव होते. या गावात जाण्यासाठी दोन मार्ग असून एका मार्गावर १० किलोमीटरचा कच्चा रस्ता व अभयारण्य आहे, तर दुसऱ्या मार्गावर पेंच धरण आडवे येत असल्यामुळे येथे आवागमनासाठी नावेचा वापर करावा लागतो. हे गाव तिन्ही बाजूने पेंच व्याघ्र प्रकल्पाने व्यापले आहे. त्यामुळे तेथे आतापर्यंत वीज पोहचली नव्हती. स्थानिक प्रशासनाने महावितरणशी केलेल्या नियमित पाठपुराव्यामुळे किरंगीसर्रा विद्युतीकरणामुळे प्रकाशमय झाला आहे.
ग्रामीण परिमंडळातील १०० टक्के गावांचे विद्युतीकरण झाले आहे. किरंगीसर्रा विद्युतीकरणाचे लोकार्पण नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता सचिन तालेवार, सहाय्यक अभियंता हेमेंद्र गौर, कनिष्ठ अभियंते कुंदन पाटील, प्रीती फुले, सारिका जयस्वाल व गावकरी उपस्थित होते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirangisarra electrification dedicated to peoples after 66 years