यंदाच्या हंगामात २ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून, या वर्षी शेतकऱ्यांच्या उसाला मांजरा परिवाराप्रमाणे भाव देणार असल्याचे आश्वासन मारुती महाराज कारखान्याचे अध्यक्ष दिनकर माने यांनी दिले. कारखान्याच्या नवव्या गळीत हंगामाचा प्रारंभ श्याम चैतन्यमहाराज माकणीकर, राजेंद्र गिरीमहाराज देवताळा, बालकीर्तनकार महेश महाराज यांच्या हस्ते झाला. आठ हंगामांत सलग ऊस देणाऱ्या मंगलाताई भिकू जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माने म्हणाले, की या वर्षी हंगामात पाण्याची टंचाई जाणवत आहे. गेल्या हंगामात चांगले काम केलेल्या कारखाना कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. कारखान्यावर ८ कोटींचे कर्ज आहे. या हंगामात हप्त्याची परतफेड करण्याचा संकल्प संचालकांनी केला आहे. गेल्या हंगामातील साखर शिल्लक आहे. या रकमेवरील व्याज कारखान्याला सोसावे लागत आहे. नाबार्ड व राज्य बँकेच्या आदेशावरून ३ हजार रुपये उचल दिल्यास, शेतकऱ्यांच्या उसाला भाव देण्यास अडचण होणार नाही. हंगामात बँकेने दिलेल्या उचलीत ४०० रुपयांचा खर्च वजा करून भाव देण्याचे धोरण आखले आहे. शेतकऱ्यांनी डळमळीत न होता मारुती महाराज कारखान्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन माने यांनी या वेळी केले. कार्यकारी संचालक बी. व्ही मोरे यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आदी उपस्थित होते.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti maharaj factory gets as same as manjra factory rate for sugercainsays dinker mane