महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजनांची वल्गना करणाऱ्या नवी मुंबई महानरपालिकेच्या योजना विभागाने दिद्या येथील धम्म ज्योत महिला बचत गटाला रोजगार दिले खरे पण योजना विभागाच्या नियोजनाअभावी या महिला बचत गटाला कर्जाच्या खाईत लोटले आहे. कर्ज दिलेल्या बॅँकेने थकित हप्त्यासाठी तगादा लावला आहे. ऐन महिला दिनांच्या पूर्वसंध्येला बचत गटातील महिलांच्या घराला टाळे ठोकण्याचे फर्मान बँकेने काढल्याने करायचे काय, असा प्रश्न या महिलांना पडला आहे. अनेकदा जनता दरबारात उद्योगासाठी जागा देण्याची मागणी त्यांनी केली असताना तिथेदेखील न्याय मिळाला नाही. विशेष म्हणजे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या बचत गटाच्या वडापावच्या गाडीचे उद्घाटन २ वर्षांपूर्वी महिला दिनी करण्यात आले होते.
केंद्र शासनाच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजना विभागाच्या मार्गदर्शनाखाली दिद्यातील विष्णुनगर येथील धम्म ज्योत महिला बचत गटाने अर्थसाहाय्य घेऊन फिरते वडापाव स्टॉल सुरू केले. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या नवी मुंबईतील पहिल्या महिला बचत गटाच्या उपक्रमाचा पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जोरदार शुभांरभदेखील करण्यात आला. या वेळी उपस्थित पुढाऱ्यांनी बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्टॉलला जागा देऊ आणि योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.
फिरत्या वडापावची गाडी सुरुवातीला २ ते ३ महिने हा स्टॉल रबाले नाका, त्यांनतर ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर लावण्यात आला. २ लाख ३७ हाजार ५००रुपयांचे कर्ज बँकेकडून महिलांनी घेऊन हा उपक्रम सुरू केला. योजना विभागाने उद्योगासाठी अर्थसाहाय्य देताना अर्थ उत्पादनासाठी जागा नियोजित करणे अनिवार्य असताना, मात्र केवळ योजना विभागाने कर्जाची खिरापत बचत गटांना वाटली. ऐरोली रेल्वे स्थानकाच्या परिसरात धम्मज्योत महिला बचत गटाची फिरत्या वडापावची गाडी लागते. या गाडीचे सर्व परवाने असतानासुद्धा केवळ अतिक्रमणाचे कारण पुढे करीत पालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केली. पोलीसही दिवसागणिक या महिलांकडून पैसे उकळत आहेत. त्यामुळे व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न या महिला बचत गटाला पडला आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री गणेश नाईक यांनी योजना विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा किमान गाडी उभी राहील, अशी जागा देण्याची सूचनादेखील करण्यात आली होती. पंरतु योजना विभागाच्या आल्हाटी कारभारामुळे त्याचबरोबर जनता दरबारातदेखील न्याय न मिळाल्याने या बचत गटांवर सध्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.
सातत्याने केल्या जाणाऱ्या कारवाई, योजनेचे नियोजन आणि जागा निश्चित नसल्याने या बचत गटावर आजमितीस उद्योग करण्याची उमेद असताना केवळ अनास्थेपायी बेकारीचे संकट कोसळले आहे. कर्ज दिलेल्या बँकेने कर्जाचे हप्ते थकल्याने बचत गटाच्या महिलांना चक्क जप्तीची नोटीस बजावली आहे. एकंदरीतच योजना विभागाकडे जर नियोजनच नव्हते तर बचत गटांना अशाप्रकारे आमिष दाखवून पालकपोळी का भाजली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माय मरू देत नाही अन् शासन जगू देत नाही, अशी दयनीय अवस्था धम्म ज्योत महिला बचत गटाची झाली आहे.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलेल्या आदेशानुसार या बचत गटाच्या गाडीवरदेखील इतरांप्रमाणे अतिक्रमण पथकाने कारवाई केली आहे. या बचत गटाला महापालिकेकडे देण्यासाठी कोणतीही जागा नाही, परंतु बचत गटासाठी चर्चा करून योग्य मार्ग काढण्यात येईल.
ना. ना. आल्हाट
नमुमंपा योजना विभाग उपआयुक्त