– चारूशीला कुलकर्णी

नणंदेच्या लग्नाची धामधूम संपली तशी पाहुण्यांनी आपापल्या घरचा रस्ता धरला. काही ज्येष्ठ मंडळी घरी असली, तरी कामांचा बोजा कायम होता. कामाच्या घाईगर्दीतही राजश्रीच्या मनात अनामिक भीती होती. सारं कसं रीतीनं होत असताना नणंदेची म्हणजे साक्षीची पहिली रात्र, त्या रात्री चादरीवर अपेक्षित असलेला लाल डाग, असं सारं काही तिच्या डोळ्यांसमोर फिरत होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साक्षी उच्चशिक्षित होती, खेळाडू, स्वभाव जरासा आडदांड. त्यामुळे हिचं कसं होणार, याची सगळ्यांनाच काळजी होती. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर ‘पहिल्या रात्री’ झालेल्या ‘कौमार्य चाचणी’त नाकारल्या गेलेल्या मुलींचे चेहरे फिरत होते. महाराष्ट्रात, देशात कौमार्य चाचणीला मान्यता नाही. तरी अनेक जातींमध्ये ही चाचणी उघडपणे होते. त्याला त्या समाजाच्या पंचांची, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मान्यता आहे. या समुदायांबाहेरसुद्धा लग्नाच्या वेळी मुलींचं ‘कौमार्य’ कधी तोंडावर स्पष्ट विचारून, तर कधी आडून आडून अंदाज घेऊन तपासण्याचे प्रयत्न सतत होत असतात. व्यापक समाजाचा आपण अविभाज्य भाग असल्यानं हे सारं वास्तव नाईलाजानं का होईना, पण आपल्याला स्वीकारावं लागत आहे.

हेही वाचा – आला जमाना ‘स्मार्ट’ अंडरवेअरचा!

मनातली चलबिचल लपवण्याचा राजश्री प्रयत्न करत असताना तिला तिची पहिली रात्र आठवली. नवरा निलेश सहज तिला म्हणाला होता, “अगं, आपला रात्रीचा प्रयोग घाईतच आटोपला. तुला काही त्रास होणं अपेक्षित होतं, पण झाला नाही. मी डॉक्टरांशी बोललोय त्याविषयी. ते म्हणाले, ज्या मुली मैदानी खेळ खेळतात, सायकल चालवतात, त्यांना हा त्रास होत नाही. असंही तू सायकलवरच जायचीस ना कॉलेजला?…”

निलेश तिला या बोलण्यातून काही संकेत देत होता. पण तिचं वेडं मन त्या पहिल्या स्पर्शाच्या नवलाईत रमलेलं होतं. “तू जायचीस ना सायकलवरूनच कॉलेजला?” या त्याच्या प्रश्नानं ती दचकली. “हो! मग?…” तिला त्या प्रश्नाचा उलगडाच होईना. थोड्या वेळानं तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि पहिल्या रात्रीची तिची स्वप्नं… सिनेमात दाखवतात तसं चित्र- म्हणजे दुधाचा ग्लास, डोक्यावर पदर, छानशी सजलेली ती… हे सारं काही एका क्षणात विरलं. काही क्षणांमध्येच नवऱ्याच्या त्या प्रश्नाचा अर्थ तिला कळला होता. ‘कौमार्य चाचणी’! व्हर्जिनिटी टेस्ट. शब्द बदलला, काळ बदलला, संदर्भ तेच! त्या प्रश्नातून निलेश आपल्या चारित्र्याची परीक्षा घेत असल्याची बोच तिच्या मनात आजही सलते आहे. साक्षीच्या बाबतीत आता काय वाढून ठेवलं आहे, याचा शोध ती मनानं घेत राहिली.

खरंतर कौमार्य चाचणी नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे आणि तिला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनंही स्पष्ट सांगितलं आहे. तरी इंडोनेशिया, इराक, तुर्कस्तान अशा अनेक देशांमध्ये ही प्रथा पाळली जाते. भारतातही अनेक समाजांमध्ये कौमार्य चाचणी महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रात बंजारांसह इतरही काही समाजांमध्ये ही प्रथा पाळली जाते. या चाचणीत मुलगी अपयशी ठरली, तर पंचायतीनं दिलेल्या परीक्षेला तिला सामोरं जावं लागतं. त्यामुळे अनेक विवाहितांचे घटस्फोट झाले आहेत. काहीजणी आयुष्यातून उठल्या.

हेही वाचा – National Doctors Day : पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण होत्या ?

परदेशातील तऱ्हाच वेगळी! काही ठिकाणी लग्न ठरलं, की हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून तसं प्रमाणपत्र जोडीदाराकडे सादर केलं जातं. या सर्व प्रकारात महिलांच्या मानसिकतेचा कुठेच विचार नाही. त्यांच्या मनाशी आणि कित्येकदा जीवनाशीच खेळ खेळला जातो. मात्र प्रथा-परंपरा यांच्या नावाखाली याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत आहे.

मनाचा स्वप्नाळूपणा उद्ध्वस्त करणाऱ्या एका अनुभवातून गेलेली राजश्री आणि आपल्याला कोणत्या ‘चाचणी’ला सामोरं जावं लागेल, याची कल्पनाच नसणारी भाबडी साक्षी, या केवळ प्रतिनिधी. बाकी आडून आडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊन आपलं ‘कौमार्य’ सिद्ध करणाऱ्या विवाहिता आपल्या आजूबाजूला पुष्कळ आहेत.

(या गोष्टीतली नावे बदलली आहेत.)

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the virginity of sakshi be proved ssb