छत्रपती संभाजीनगर : एका बाजूला राज्यभर औषध तुडवडय़ाची ओरड सुरू असताना  २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान राज्य सरकारच्या वतीने तुळजापूर येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास प्रत्येक जिल्ह्यातून दहा साठय़ांचे वितरण करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालक डॉ. आर.बी. पवार यांनी काढले आहेत.अशा प्रकारे विविध जिल्ह्यांतून औषधे गोळा करण्यापेक्षा राज्य सरकारने महाआरोग्य शिबिरासाठी स्वतंत्र तरतूद करावी व त्यातून औषधे द्यावीत, असे धाराशीवचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने औषधी वितरणासाठी त्यांनी सारी यंत्रणा कामाला लावली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान चालत येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. त्यामुळे अतिरिक्त औषधे लागतात. दरवर्षी तुळजापूर नगरपालिकेसाठी यात्रा अनुदानही मंजूर होते. मात्र या वर्षी  नवरात्रमहोत्सवादरम्यान आरोग्य शिबिराचेही आयोजन केले आहे. राज्यातील औषधांचा तुटवडा असताना महाआरोग्य शिबिरे घेऊन सरकारला नक्की काय साधायचे आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. या अनुषंगाने बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले, ‘हाफकिनने गेल्या वर्षी औषधे विकत घेतली नाहीत. या वर्षीही निधी पडून आहे. रुग्णांच्या सरासरीच्या आधारे दिलेल्या औषध साठय़ातून होणारी पळवापळव राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना ठप्प करणारी आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी व्यवस्था आणखी किती पांगळी करणार आहेत, हेच कळनासे झाले आहे.’

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drug diversion from other districts for maha arogya camp in tuljapur amy