धाराशिव : यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासून पाऊस जिल्ह्यात हजेरी लावून आहे. दुपारपर्यंत उन्ह, नंतर ढगाळ वातावरण आणि सायंकाळच्या सुमारास मृग नक्षत्राच्या धो-धो बरसणाऱ्या पाऊसधारांनी शेतकरी वर्ग सुखावला आहे. यंदा वेळेवर पाऊस, वेळेवर पेरणी झाली तर उत्पादनातही मोठी बरकत होईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र जिल्ह्यातील आठपैकी धाराशिव आणि कळंब तालुक्यात समाधानकारक व पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृग नक्षत्र सुरू होवून तीन दिवस झाले आहेत. शुक्रवारी मृगाच्या पहिल्या दिवशी धाराशिवसह, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात मृगाच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या या पावसाने शेतशिवार ओला केला. खरिपाच्या पेरण्यांसाठी पेरणीपूर्व मशागतींची कामे उरकून बसलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

हेही वाचा : बीडमध्ये तणाव; पंकजा मुंडेंनंतर मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान

जिल्ह्यातील ४५ पैकी २३ मंडळात शनिवारी दुपारनंतर झालेल्या पावसाने शेतकरी सुखावले आहेत. धाराशिव शहर व ग्रामीणमध्ये ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बेंबळी मंडळात २४ मिलीमीटर, केशेगाव ३१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तुळजापूर तालुक्यात एकूण २१ मिलीमीटर पाऊस झाला असून ग्रामीण मंडळात ३२ मिलीमीटर तर सलगरा आणि नळदुर्ग मंडळात ५८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सावरगाव, मंगरूळ, आणि इटकळ येथेही २५ पेक्षा अधिक मिलीमीटर पाऊस आहे. परंडा मंडळात २९.५ मिलीमीटर तर सोनारी मंडळात २० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भूम तालुक्यातील माणकेश्वर मंडळात २५ तर वालवड मंडळात ३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. उर्वरित मंडळांना अजूनही समाधानकारक पावसाची प्रतिक्षा आहे. कळंबमध्ये पाऊस नगन्य आहे. तालुक्यातील केवळ दोन मंडळात शनिवारी पाऊस झाला. ईटकूर व येरमाळा मंडळात १८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यातील मुरूम मंडळात ३२ मिलीमीटर, उमरगा शहर १९ तर नारंगवाडी मंडळात १० मिलीमीटर पाऊस झाला आहे. उर्वरित मंडळात तुरळक ठिकाणी पाऊस आहे. लोहारा तालुक्यातील माकणी मंडळात ३३ तर लोहारा येथे १७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. वाशी तालुक्यात २० मिलीमीटर पाऊस झाला आहे. पारगाव मंडळात २५ तर तेरखेडा मंडळात १७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान पुढील तीन दिवस मृग नक्षत्राचा पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. कळंब आणि धाराशिव तालुक्याला मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

शेतकरी पेरणीसाठी सज्ज

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. पेरणीपूर्व मशागतींची सर्व कामे उरकून बसलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदीसुद्धा पूर्ण केली आहे. एकंदरीत पेरणीसाठी तयारीत असलेला शेतकरी पाऊस होत नसल्याने थोडीबहुत चिंता आहे. खरिपाच्या पेरण्या वेळेवर होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा : बीडमधील ‘सर्पराज्ञी’त पक्षाघाताने घायाळ हरणीचे बाळंतपण

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी

जिल्ह्यात मागील नऊ दिवसांत एकूण १६३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदल्या गेलेल्या तालुकानिहाय पावसाची आकडेवारी व कंसात यंदाचा आजवरचा पाऊस मिलीमीटरमध्ये आहे. धाराशिव २२ मिलीमीटर (४१), तुळजापूर ३६ (७२), परंडा १८ (७१), भूम २२ (७१), कळंब ९ (३३), उमरगा १७ (८९), लोहारा २२ (६०), वाशी २० (७८) जिल्हा २१ (६२) याप्रमाणे पाऊस झाला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dharashiv heavy rainfall at kalamb taluka css