छत्रपती संभाजीनगर/हिंगोली – विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारेच्या धक्क्याने मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरजवळील चिकलठाणा येथील घटनेतील दोन मृतांमध्ये काका-पुतण्याचा समावेश असून सोमवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी रात्री अडीच तास जालना रोडवर ठिय्या देत रास्ता रोको केला. कचरू दहिहंडे व किरण दहिहंडे, अशी मृत काका पुतण्याचे नावे आहेत.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडकोचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, दंगा काबू पथक आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी रस्त्यावरील आंदोलनात ४०० ते ५०० ग्रामस्थ होते. दहिहंडे कुटुंबीयांची बीड बाह्य वळण रस्त्यालगत शेती असून, त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्याचे सांगण्यात आले. शेताजवळून गेलेल्या विद्युत पोलच्या तारेला स्पर्श होऊन काका-पुतण्यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वारंगाहून बोथीकडे जाणाऱ्या ११०० के. व्ही. वारंगा शिवारात लोंबकळलेल्या विद्युत वाहिनीच्या तारेचा धक्का लागल्याने वारंगा फाटा येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर दोघे जखमी आहेत. मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव अप्पाराव पतंगे आहे. ही घटना १६ जून रोजी घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. वारंगाफाटा शिवारातगट क्र.४९४ मध्ये असलेल्या विद्युत तारेला स्पर्श होताच अप्पाराव दाजीराव पतंगे (वय ६२) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर गणेश शंकर जाधव (वय ५२, रा. येडशीतांडा) आणि पंजाबराव पतंगे (वय ६०, रा. कुर्तडी) हे दोघे जखमी झाले आहेत.

हे सर्व शेताची खाजगी मोजणी करत होते. याच शेतातून वारंगाफाटा येथून बोथीकडे जाणाऱ्या ११०० केव्हीच्या विद्युत वाहिनीच्या लोंबकळलेल्या तारांचा शॉक लागल्याने अप्पाराव यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश, पंजाबराव जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले होते. मृताची उत्तरीय तपासणी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.