भारतीयांचं ऑस्कर या सोहळ्याबद्दलचं अप्रूप काही केल्या कमी होत नाही. बरं ऑस्करचं नामांकन मिळालेल्या चित्रपटाचं नाव सामान्य प्रेक्षकांनी कधीच ऐकलेलं नसतं. अचानक एखाद्या चित्रपटाला ऑस्कर मिळतो आणि सगळीकडे त्याचा गवगवा होतो, चारचौघात बोलताना अडचण येऊ नये म्हणून लोकं कळत नसतानाही तो चित्रपट पाहतात. असं माझंतरी निदान निरीक्षण आहे. यामध्ये मी चुकीचा असू शकतो. मध्यंतरी ‘पॅरासाईट’ला जेव्हा ऑस्कर मिळाला तेव्हा माझ्या ओळखीतल्या बऱ्याच लोकांनी तो पहिला. त्यापैकी बहुतांश लोकांना ‘पॅरासाईट’ या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता. यावरून एक गोष्ट ध्यानात आली की आपल्या लोकांवर पाश्चात्य संस्कृती आणि तिथल्या गोष्टींचा प्रभाव अजूनही आहे आणि तो अधिकाधिक वाढतोच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे सगळं आज लिहिण्यामागे कारण एकच पुन्हा यावर्षीच्या ऑस्करच्या यादीतील असंच एक ‘पॅरासाईट’सारखं नाव ते म्हणजे भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून निवड झालेला ‘छेलो शो’ हा गुजराती चित्रपट. माझं कोणत्याही प्रादेशिक भाषेशी किंवा तिथल्या कला साहित्याशी अजिबात वाकडं नाही. पण मी स्वतः या चित्रपटाचं नाव आज प्रथम ऐकलं आणि मला खात्री आहे की भारतातील ९०% लोकांनीदेखील हे नाव आत्ताच ऐकलं असणार. तरी आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म या कॅटेगरीमध्ये हा चित्रपट निवडावा असं आपल्या फेडरेशनला का वाटलं असेल हे न उलगडलेलं कोडंच आहे.

बरं असं म्हणून मला त्या चित्रपटाच्या मेरिटवर अजिबात शंका उपस्थित करायची नाही. तो चित्रपट चांगला असेल तर नक्कीच त्याचं कौतुक व्हायलाच हवं, पण गेली काही वर्षं ज्याप्रकारचे चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी जात आहेत ते पाहता येत्या काही वर्षात ऑस्कर भारताकडून एकही एन्ट्री स्वीकारणार नाही. अर्थात हा गंमतीचा भाग झाला. असं काही होणार नाही पण चित्रपट निवडीची प्रक्रिया किंवा त्याचे निकष अगदी सगळं प्रेक्षकांना माहिती नसलं तरी एखादा चित्रपट ऑस्करला पाठवायच्या लायकीचा आहे की नाही हे सरळसोट उत्तर कोणताही चित्रपटरसिक देऊ शकतो.

आजवर भारताकडून पाठवलेल्या चित्रपटांपैकी केवळ ३ चित्रपटांना नामांकन मिळालेलं आहे. ते ३ चित्रपट म्हणजे ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘लगान’. ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजित रे यांचे तब्बल ३ चित्रपट ऑस्करसाठी पाठवले गेले त्यापैकी एकाही चित्रपटाला नामांकन यादीत स्थान मिळालं नव्हतं. रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ ला नामांकनच काय तर ऑस्करदेखील मिळायला हवा होता इतका तो चित्रपट परिपूर्ण होता, पण बाकीच्या चित्रपटांचं काय? ते खरंच तितके उत्तम बनले होते का? ते चित्रपट बनवणाऱ्याची विचारधारा काय होती? या सगळ्या गोष्टींवर विचार करणं आवश्यक नाही का? यावर नक्कीच चर्चा व्हायला हवी. आत्तापर्यंत ऑस्करसाठी पाठवलेल्या २ ३ चित्रपटांची नावं सोडली तर बाकीचे चित्रपट फिल्मफेअरची नामांकनही मिळवण्यासाठीदेखील पात्र नव्हते. ज्यांना कोणालाही अतिशयोक्ती वाटत असेल त्यांनी ऑस्कर नामांकनाची यादी जरूर बघावी त्यावरून नक्कीच अंदाज येईल.

आणखी वाचा : “मला महाभारत हे X-men सारखं…”; शाहरुखने व्यक्त केली होती मनातील सुप्त इच्छा

उदाहरणं द्यायची झाली तर बरीच आहेत. ज्यावर्षी ब्लॅकसारखा उत्कृष्ट चित्रपट बनला त्यावर्षी भारताने बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलेला त्याचवर्षीचा ‘पहेली’ हा चित्रपट नामांकनासाठी पाठवला. २०१२ मध्ये जेव्हा ‘बर्फी’सारखा चित्रपट ऑस्करला पाठवला तेव्हा ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ कींवा ‘कहानी’सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर वेगळाच इतिहास रचला होता. २०१३ मध्ये ज्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठं नाव कमावलं त्या ‘द लंचबॉक्स’सारख्या चित्रपटाला डावलून आपल्या फेडरेशनने जावई शोध लावून ‘द गुड रोड नावाचा’ गुजराती चित्रपट आणला आणि तो ऑस्करला पाठवला. २०१९ मध्ये तर ज्या चित्रपटाच्या फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्यावरून गदारोळ झाला अशा ‘गलीबॉय’ला आपण ऑस्करसाठी पाठवलं. त्यावर्षी खरंतर ‘तुंबाड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गारुड केलं होतं तरी त्याला डावललं गेलं. बरं ही काही मोजकी उदाहरणं झाली. आणखीन मागे जाऊ तसे एक एक भयानक चित्रपट आपल्याला सापडतील. ‘रेश्मा और शेरा’, ‘सारांश’, ‘हिना’, ‘परिंदा’, ‘एकलव्य’ हे चित्रपटही आपण ऑस्करला पाठवले आहेत हे पाहून मी तरी या निवडसमितीपुढे हातच जोडले. भारतीय बॉक्स ऑफिसपुरता विचार केला तर यातले काही चित्रपट खरंच चांगले आहेत, पण ऑस्करला पाठवण्याइतकं त्यांच्यात काही नाही हे कोणताही सामान्य प्रेक्षक सांगू शकेल.

असो यावेळीही ‘आरआरआर’ आणि ‘द कश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट डावलून पुन्हा या निवड समितीने त्यांच्या पोतडीतून किमान भारतीयांसाठी तरी अनोळखी असणारा चित्रपट ऑस्करला पाठवला आहे. जे दोन चित्रपट हिट ठरले त्यामागची विचारधारा याला कारणीभूत आहे की आणखी काही हे आपल्याला समजणं तसं कठीण आहे. पण इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये आणि या ‘छेलो शो’चा ‘पॅरासाईट’ होऊ नये एवढीच आशा करतो.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog about indian films sent for oscars are really deserving or not avn
First published on: 21-09-2022 at 12:33 IST