UPSC Success Story केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी प्रिलिम्स, मग मेन आणि शेवटी मुलाखत. अनेक जण वर्षानुवर्षे कोचिंग घेतात, पण ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरम्यान, आज आपण बिहारची राजधानी पाटणा येथील बिशुनपूर पाकडी या गावातून आलेला अतिशय खोडकर असा मुलगा कसा आयएएस होतो हे जाणून घेणार आहोत. शाळेतून शिक्षकांच्या वारंवार तक्रारी ते आज आयएएस अधिकारी कसा झाला, आदित्य पांडेचा प्रवास जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…तर मी माझ्या मिशा काढून टाकेन”

यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आदित्य आयएएस अधिकारी झाला. त्याला ओळखणाऱ्यांसाठी हा क्षण जितका आनंदाचा होता तितकाच धक्कादायक होता. त्याच्या खोडसाळपणाच्या कहाण्या गावभर प्रसिद्ध होत्या. त्याचे शिक्षक तक्रारींचा गठ्ठा घेऊन त्यांच्या घरी येत असत. स्वत: आदित्य पांडेला त्याच्या खोडसाळपणाचे किस्से आठवतात. एकदा त्याच्या शिक्षिकाने त्याच्या वडिलांकडे तक्रार केली आणि सांगितले, ‘जर आदित्य त्याच्या अभ्यासात गंभीर झाला तर मी माझ्या मिशा काढून टाकेन.’ हा प्रसंग आठवून तो खूप हसतो. यावरून त्याच्या बालपणीच्या दिवसांची कल्पना येऊ शकते. त्यानंतर आदित्य पांडेने खूप मेहनत घेतली. आधी इंजिनीअर झाला आणि नंतर एमबीएची पदवी घेतली. याने त्याचे समाधान झाले नाही तेव्हा त्याने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली आणि शेवटी तो आयएएस अधिकारी बनला.

UPSC इच्छुकांनी परीक्षेत किमान ८४ प्रश्न सोडवले पाहिजेत

१२वी उत्तीर्ण झाल्यानंतर आदित्य पांडेने पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून बीटेक केले. त्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. त्यानंतर आदित्य पांडेने आयआयटी रुरकीमधून एमबीए केले. दोन वर्षे एका खाजगी बँकेत काम केल्यानंतर २०२० मध्ये UPSC परीक्षेच्या तयारीसाठी त्याने नोकरी सोडली. यूपीएससी परीक्षेत दोन वेळा तो नापास झाला होता. मात्र, त्याने पराभव स्वीकारला नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर आदित्य पांडेने २०२२ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले. UPSC CSE 2022 मध्ये ऑल इंडिया ४८ वा रँक मिळवून तो आयएएस अधिकारी झाला. त्याला यावेळी झारखंड केडर देण्यात आले. सध्या तो झारखंडची राजधानी रांचीमध्ये असिस्टंट कलेक्टर पदावर आहे. नागरी सेवा परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात तो फक्त २.५ गुणांनी कटऑफ लिस्ट चुकला, म्हणून तो सल्ला देतो की UPSC इच्छुकांनी परीक्षेत किमान ८४ प्रश्न सोडवले पाहिजेत.

हेही वाचा >> Success Story: युपीएससीसाठी सोडली २८ लाख रुपयांची नोकरी; ‘या’ पॅटर्नने अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात मारली बाजी

आदित्य पांडे सांगतो की, यूपीएससी मुलाखतीची तयारी करणाऱ्या इच्छुकांनी त्यांचा DAF अतिशय काळजीपूर्वक वाचावा. यूपीएससी मुलाखतीत DAF कडून प्रश्न नक्कीच विचारले जातात. यूपीएससी मॉक इंटरव्ह्यू या प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा खूप वेगळ्या असतात. एवढेच नाही तर यूट्यूबवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंवर जास्त विश्वास ठेवू नका, असाही सल्ला त्याने दिला.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya pandey upsc success story engineer turned ias aaditya pandey success story will motivate you to succeed in upsc prelim upsc interview questions srk