प्रत्यक्षातील व माझ्या ह्दयातील अंतज्योत या सारख्याच आहेत. पण अंतकरणातील ज्योत अधिक महत्त्वाची आहे. ती ज्योत शिवस्वरूप आहे. ‘तत्त्वमसि’ ची प्रचीती देणारी आहे..म्हणूनच हा दीपोत्सव खऱ्या अर्थाने अंतरीचा दिवा चेतविणारा व्हावा यासाठीच अनुभवायचा आहे. ही आध्यात्मिक दीपावली अधिकच आनंदमय करायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी घरी नवीन वर्षांचे कॅलेंडर आले, की घरातील लहान-थोर सगळीच मंडळी दोन गोष्टी पटकन बघतात. आपला वाढदिवस व त्याला जोडून येणाऱ्या सुट्टय़ा आणि या वर्षीच्या दिवाळीच्या तारखा!
सुट्टीची धमाल, आनंद साजरा करण्यासाठी आपले बेत आधीपासूनच आखले जातात. हा सारा आनंद, जो आपला मूळ गाभाच आहे, तो आपल्याला रोजच्या जीवनात खऱ्या अर्थाने अनुभवता यावा यासाठीच आपल्या सणवारांची निर्मिती झाली असावी. आपल्या पूर्वजांनी या दीपावलीची आखणी इतकी सुरेख केली आहे की, प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात एक सुंदर विचारमूल्य, संस्काराची एक न विझणारी पणती लावतो.
खऱ्या अर्थाने वसुबारस, म्हणजेच आश्विन कृष्ण द्वादशी, यालाच गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. सहिष्णुता, शांतता, क्षमाशीलता, उपयुक्तता, उत्पादकता, समृद्धता या साऱ्याचे प्रतीक म्हणून गोमातेचे पूजन ऋग्वेद कालापासूनच सांगितले गेले आहे.
 कृष्णाला ‘गो’पाल असे नाव आहे. ‘गो’ म्हणजे संस्कृतमध्ये ‘इंद्रिये’. ज्याने इंद्रियांनाही ताब्यात घेतले आहे तो गोपाल. या इंद्रियांचीही जी माता ती ‘गो’माता. ‘योग’ ही इंद्रियनिरोधाची साधना असल्याने १२ आदित्य, ११ रुद्र, ८ वसु आणि दोन अश्विनीकुमार शरीरातील (वायू व अग्नी यांचे प्रतीक) अशा ३३ (कोटी) देवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोमातेचे पूजन आपण साऱ्या साधकांनी केलेच असणार.
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती! जगातील प्राचीनतम स्वास्थ्याचा वेध घेणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद! या आयुर्वेदात वर्णन केलेली आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरी! धन्वंतरी देवता म्हणजे देवांचाही फॅमिली डॉक्टर! या दिवशी आठवणीने म्हटलेले व एरवीही नित्य प्रार्थनेचा आवश्यक भाग असलेले धन्वंतरी स्तोत्र वेगळाच आनंद देते.
अभिनिवेश म्हणजेच मृत्यूची भीती हा माणसाच्या जगण्याचा केंद्रिबदू आहे. मृत्यूला, यमाला टाळण्यासाठी जे काही शक्य आहे ते माणूस करणारच, हे आपल्या पूर्वजांनी ताडले. समुद्रमंथनाच्या अतिशय सुंदर अशा कथेत मंथनातून ज्या काही मौल्यवान गोष्टी बाहेर आल्या, त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे धन्वंतरी देवता!
अत्यंत तेजस्वी, चार बाहूंमध्ये शंख, जौलिका (जळू), चक्र आणि अमृतकुंभ घेऊन प्रकटलेला धन्वंतरी आपल्या अस्तित्वाने आजारांना, अपमृत्यूला भीतीला दूर पळवितो, अमृतत्व बहाल करतो.
 त्याच्या हातातील गोष्टींनाही अत्यंत सुरेख, प्रतीकात्मक अर्थ आहे. मुख्य म्हणजे या गोष्टी त्याच्या ‘हातात’ आहेत. त्याच्या अवतीभोवती नाहीत. आपले ‘स्वास्थ्य’ आपल्याच हातात आहे, पण त्या जाणिवेसह साधना करेल त्याला आरोग्यप्राप्ती झालीच पाहिजे. सुदर्शन चक्राचे हे बारा महिने, सहा ऋतूंचे प्रतीक आहेत. दुर्जनांचा संहार करणारे हे चक्र आपल्यातीलच नकारात्मक प्रवृत्तींचा नाश करून २४/७ काळ आपल्याला ‘स्वस्थ’ च ठेवेल हे नक्की.
नरक चतुर्दशी हा तर नरकासुराच्या वधाचा दिवस – माझ्या वाचनात आलेले या कथेचे रूप- हा वध कृष्णाच्या बरोबर सारथी म्हणून गेलेल्या सत्यभामेने केला आहे. दृष्ट प्रवृत्तींचा स्त्री-शक्तीने केलेला बीमोड! वध कुणीही करो! वाईट प्रवृत्तींचा नाश होणे महत्त्वाचे! त्यांच्या नावाने औषधी गुण असलेल्या उटण्याने अभ्यंगस्नान करणे तर अधिकच शुचिता, सामथ्र्य प्रदान करणारे!
लक्ष्मीपूजन चक्क अमावास्येच्या दिवशी केले जाते! अंधकार, तिमिराचेही दिव्यांनी स्वागत करणारा हा सण आहे असे वाटते. दिवाळी दु:खी असूच शकत नाही किंवा असूही नये. अंधारातही दीप उजळण्याचे सामथ्र्य आपल्या विचारसंपदेत आहे. आपल्या संस्कृतीने लक्ष्मीला त्याज्य मानलेले नाही. पण त्या संपत्तीचा माज, मस्ती येऊ नये, ती संपत्तीदेखील चांगल्या मार्गानेच मिळविण्याची सद्बुद्धी मिळो या अर्थाने हे पूजन केले जाते. प्रश्नोपनिषदामध्ये प्राणायामाच्या प्रार्थनेतही ‘श्री’ म्हणजे धनसंपत्ती, बुद्धिसंपदा व ‘प्रज्ञा’ देण्याची प्रार्थना केली आहे.
 दिवाळीचा पाडवा काही ठिकाणी गोवर्धन पूजन करून साजरा केला जातो. वामनावतारात विष्णूंनी बळीच्या डोक्यावर तिसरा पाय ठेवून त्याला पाताळलोकात पाठविले, तो हा दिवस. बळींचे स्मरण करून हा दिवस साजरा केला जातो. अर्थातच बळी हा राजा उदार, शूर, वीर, बलवान, सत्त्वशाली, ज्ञानार्जनासाठी सदैव तत्पर असा होता. हा सण साजरा करताना हे गुण आपल्या अंगी यावे अशी प्रार्थना करण्यास काहीच हरकत नाही. शेवटी साधनेची परिणती या साऱ्यांत होणेच अपेक्षित असते.
भाऊबीज म्हणजे यमद्वितीया. यम हा सूर्याचा पुत्र मानला जातो. विवस्वान, ज्याला योग प्रथम सांगितला, तो उगवत्या सूर्याचे प्रतीक व यम हा मावळत्या सूर्याचे प्रतीक! त्याची जुळी बहीण म्हणजे त्याला जोडून येणारी रात्र! किंवा यमी / यामिनी.
जीवनाची ज्योत मध्येच विझू नये म्हणून या यमराजाच्या कृपावरदानासाठी, आरोग्यप्राप्तीसाठी आपण हा दीपोत्सव साजरा करतो. हे करीत असताना तेजाचे, अग्नीचे, रूप असणाऱ्या या दिव्याला प्रार्थना करताना एक प्रार्थना म्हणू या –
 अंतज्र्योति:, बहिज्र्योति:, प्रत्यकज्योती परात्परम्!
ज्योतिज्र्योति: स्वयंज्योति: – आत्मज्योतिशिवोऽस्महम्!
प्रत्यक्षातील व माझ्या हृदयातील अंत:ज्योत या सारख्याच आहेत. पण अंत:करणातील ज्योत अधिक महत्त्वाची आहे. ती ज्योत शिवस्वरूप आहे. ‘तत्त्वमसि’ची प्रचीती देणारी आहे, प्रज्ञानं ब्रह्म हा पुरावा देणारी आहे, अहंब्रह्मासिची अनुभूती देणारी आहे. शेवटी साधनेचे अंतिम उद्दिष्ट माझ्यातल्या खऱ्या ‘मी’ ला ओळखणे हेच आहे. हा दीपोत्सव खऱ्या अर्थाने अंतरीचा दिवा चेतविणारा व्हावा यासाठीच अनुभवायचा आहे. आध्यात्मिक दीपावली अधिकच आनंदमय करायची आहे.
त्यासाठीच प्रार्थना-
   असतो मा सद्गमय।
   तमसो मा ज्योतिर्गमय।
   मृत्योर्मा अमृतं गमय।
   ॐ  शांति: शांति: शांति:।।
        हरी ॐ।।    ल्ल          

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special article on diwali occasion