PM Modi letter to Nation On Diwali : भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जात आहे. या दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत देशवासियांना एक खास पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून मोदींनी जनतेशी संवाद साधत दिवाळीचा सण ऊर्जा, उत्साह आणि देशाच्या कामगिरीवर चिंतन करण्याचा काळ असल्याचं म्हटलं आहे.

मोदींनी पत्राच्या माध्यमातून देशवासियांना फक्त दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, तर एक खास आवाहनही केलं आहे. स्वदेशीचा स्वीकार करा, आरोग्याला प्राधान्य द्या, असं आवाहन करत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबतही त्यांनी भाष्य केलं. तसेच अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर ही दुसरी दिवाळी असल्याचं सांगत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धार्मिकता आणि धैर्य यावरील श्री रामांच्या शिकवणींचा संदर्भही मोदींनी सांगितला. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

‘अन्यायाचा बदला घेतला’ : मोदी

पंतप्रधान मोदींनी पत्रात म्हटलं की, “दिवाळीच्या सणाच्यानिमित्ताने तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा. अयोध्येत राम मंदिराच्या भव्य बांधकामानंतरची ही दुसरी दिवाळी आहे. भगवान श्री राम आपल्याला धार्मिकतेचं रक्षण करायला शिकवतात, तसंच अन्यायाविरुद्ध लढायलाही शिकवतात. याचं एक ज्वलंत उदाहरण आपण काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाहिलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने अन्यायाचा बदला घेतला”, असं मोदींनी म्हटलं.

‘ही दिवाळी खास आहे, कारण…’

मोदींनी पुढे म्हटलं की, “ही दिवाळी खास आहे कारण देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये, दुर्गम भागात पहिल्यांदाच दिवाळीचे दिवे लावले जातील. हे असे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी नक्षलवाद आणि माओवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात आपण पाहिलं असेल की किती नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. त्यांनी देशाच्या संविधानावर विश्वास व्यक्त केला आहे ही देशासाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे.”

‘देशवासीयांचे हजारो कोटी रुपये वाचले’

“काही दिवसांपूर्वी जीएसटीबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीचे कमी दर लागू झाले आहेत. जीएसटीच्या बचत महोत्सवामुळे देशवासीयांचे हजारो कोटी रुपयांची बचत होत आहे”, असंही मोदींनी म्हटलं.

‘स्वदेशी स्वीकारा आणि अभिमानाने सांगा’

“अनेक संकटांचा सामना करणाऱ्या जगात आपला भारत स्थिरता आणि संवेदनशीलतेचं प्रतीक म्हणून ठाम उभा आहे. भविष्यात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सज्ज आहोत. विकसित आणि स्वावलंबी भारताच्या या प्रवासात नागरिक म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी राष्ट्राप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडणे आहे. आपण स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे आणि अभिमानाने सांगितलं पाहिजे. एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे, स्वच्छतेचं पालन केलं पाहिजे, आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे, आपल्या अन्नातील तेलाचं प्रमाण १० टक्क्यांनी कमी केलं पाहिजे आणि योगासने केले पाहिजेत, हे सर्व प्रयत्न आपल्याला अधिक वेगाने विकसित होणाऱ्या भारताकडे घेऊन जातील”, असंही मोदींनी म्हटलं.