Bihar Election 2025 NDA Alliance Candidates Performance : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. अनेक संस्था व माध्यमांनी दिलेले ओपिनियन व एक्झिट पोल खरे ठरवत एनडीएने बहुमत मिळवलं आहे. एनडीएने २०२ जागांवर विजय मिळवला आहे. तर, महाआघाडीला अवघ्या ३५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. बिहारमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे.

मतदारांचं विरोधकांबाबतचं बदलेलं मत, भाजपा-जदयूचा आक्रमक प्रचार, महिला व युवकांची निवडणुकीतील भूमिका या निकालांमध्ये निर्णायक ठरल्याचं चित्र दिसत आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत उपस्थित केलेले मुद्दे, विकास, बेरोजगारी, जातीय समीकरणं, आक्रमक प्रचार निर्णायक ठरला.

एनडीएची द्विशतकाकडे वाटचाल

भारतीय जनता पार्टीने ८९ तर, जनता दलाने (संयुक्त) ८५ जागा जिंकल्या आहेत. लोक जनशक्ती पार्टीचे १९ उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रीय लोक मोर्चाला देखील चार जागांवर विजय मिळाला आहे. यामुळे एनडीएने द्विशतक पूर्ण केलं आहे. दुसऱ्या बाजूला, महागठबंधनमधील पक्षांची दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार २५ जागांवर विजयी झाले आहेत. काँग्रेसला एकेरी जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसचे सहा उमेदवार निवडून आले आहेत. बिहारमध्ये २४३ सदस्यांच्या सभागृहात एनडीएने १२२ च्या बहुमताचा टप्पा सहज पार केला असून बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

प्रशांत किशोर राजकारण सोडणार?

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीआधी ‘जनुसराज पक्ष’ या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. त्यांनी बिहारमध्ये पदयात्रा काढली होती. संपूर्ण राज्यात त्यांनी प्रचार केला. मात्र, त्यांच्या पक्षाच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, प्रशांत किशोर यांनी अनेक मुलाखतींमध्ये दावा केला होता की जदयू २५ पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही. जदयूने २५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन, असं ते म्हणाले होते. या निवडणुकीत जदयूने तब्बल ८५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता प्रशांत किशोर राजकारण सोडणार का असा प्रश्न समाजमाध्यमांवरून उपस्थित केला जात आहे.