पीटीआय, नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान झालेल्या भारत आणि पाकिस्तान संघर्षाबाबत केंद्र सरकारने देशाची दिशाभूल केली असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी केला. तर, या संघर्षात भारताचे किती नुकसान झाले याबद्दलचे सत्य देशाला सांगावे अशी मागणी काँग्रेसचे नेते उत्तम कुमार रेड्डी यांनी केंद्र सरकारकडे केली.
संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये एक वृत्तवाहिनी आणि काही वृत्तसंस्थांशी बोलताना ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताच्या लढाऊ विमानांचे नुकसान झाल्याची कबुली दिल्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले. खरगे यांनी ‘एक्स’वर लिहिले की, स्वतंत्र तज्ज्ञांच्या समितीने भारताच्या संरक्षण सज्जतेचा सर्वंकष आढावा घेतला जावा अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. कारगिल युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘कारगिल आढावा समिती’ स्थापन केली होती, त्या धर्तीवर ही समिती असावी या मागणीचा खरगे यांनी पुनरुच्चार केला.
भारतीय सैन्याचे धाडस आणि शौर्य याला आपला पक्ष सलाम करतो, पण सर्वंकष सामरिक आढावा ही काळाची गरज आहे असे खरगे यांनी ‘एक्स’वर लिहिले.
ट्रम्प यांच्या दाव्यावर उत्तराची मागणी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत व पाकिस्तानदरम्यान शस्त्रविराम घडवल्याचा दावा वारंवार करत आहेत, त्याबद्दल केंद्र सरकारने खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसने केली. शुक्रवारीही ‘‘आपण दोन्ही देशांमधील संभाव्य अणुयुद्ध टाळले याचा आपल्याला अभिमान वाटतो,’’ असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांनी न्यायालयात कथित हस्तक्षेपाबद्दल निवेदन दिले आहे. त्यावर, ‘‘मोदी यांनी देशाच्या हितसंबंधांपेक्षा व्यापाराला अधिक महत्त्व दिले का,’’ असा प्रश्न काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ‘एक्स’वर विचारला.
संरक्षण दलप्रमुखांनी सिंगापूरमध्ये एका मुलाखतीत केलेल्या टिप्पण्यांनंतर काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारणे आवश्यक झाले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्यात आले तर तसे करता येईल. मोदी सरकारने देशाची दिशाभूल केली.
मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष