वृत्तसंस्था, सिंगापूर
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या दिवशी भारताची काही लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडली, असे संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान यांनी शनिवारी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रथमच मान्य केले, मात्र त्यांनी त्याचे तपशील दिले नाहीत. किती विमानांचे नुकसान झाले त्यापेक्षा ते का झाले हे शोधून काढणे अधिक महत्त्वाचे होते, असे ते म्हणाले. त्याचवेळी भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा संपूर्ण चुकीचा असल्याचे स्पष्ट केले.
जनरल चौहान सध्या ‘शांगरी-ला डायलॉग’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले आहेत. तिथे त्यांनी ‘ब्लूमबर्ग टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, या संघर्षादरम्यान दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध होण्याचा धोका कधीही निर्माण झाला नव्हता. यावेळी पाकिस्तानबरोबर झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षात भारताने काही लढाऊ विमाने गमावली का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना जनरल चौहान म्हणाले की, ‘‘विमानांचे नुकसान का झाले हे शोधणे अधिक महत्त्वाचे होते, जेणेकरून भारतीय सैन्याला आपल्या डावपेचांमध्ये सुधारणा करता येतील आणि पुन्हा हल्ला करता येईल. त्यानुसार आम्ही डावपेचांमध्ये बदल केले आणि पाकिस्तानवर निर्णायक आघाडी प्रस्थापित केली.’’ हवाई दलाने १० मे रोजी सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सज्ज लढाऊ विमानांचे उड्डाण केले अशी माहिती जनरल चौहान यांनी दिली.
यापूर्वी, भारतीय हवाई दलाचे हवाई प्रचालनाचे महासंचालक (डीजीएओ) एअर मार्शल ए के भारती यांनी ११ मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लढाऊ विमानांचे नुकसान झाले अशी कबुली दिली होती. मात्र हवाई दलाचे सर्व वैमानिक सुरक्षितपणे परत आल्याचे सांगितले होते.
अणुयुद्धाचा धोका नव्हता
चार दिवसांच्या संघर्षाच्या काळात दोन्ही देश अणुयुद्धाच्या जवळ पोहोचले होते हा अमेरिकेचा आणि इतर पाश्चात्त्य देशांचा दावा जनरल चौहान यांनी फेटाळून लावला. पाकिस्तानचे संयुक्त सैन्यप्रमुख जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनीही संघर्षाची तीव्रता अणुयुद्धापर्यंत पोहोचली नव्हती असे यापूर्वी स्पष्ट केले आहे. जनरल चौहान म्हणाले की, ‘‘माझे वैयक्तिक मत असे आहे की, संघर्ष होतो तेव्हा सैन्यातील लोक सर्वाधिक तार्किक असतात. या ऑपरेशनदरम्यान दोन्ही बाजूंनी विचारांमध्ये तसेच कृतींमध्ये मला मोठ्या प्रमाणात तार्किकता दिसून आली. त्यामुळे आण्विक बाबतीत दोन्हीपैकी एक बाजू अतार्किकपणे वागेल असे आपण का गृहीत धरायचे?’’
चीनची मदत दिसली नाही
चीन हा पाकिस्तानचा मित्र देश असला तरी संघर्षादरम्यान चीनने पाकिस्तानला प्रत्यक्ष मदत केल्याचे दिसले नाही असे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले. चीनने पाकिस्तानला उपग्रहांच्या प्रतिमा किंवा गोपनीय माहिती पुरवली असेल का या प्रश्नाचे उत्तर देताना, अशा प्रतिमा व्यावसायिकरीत्या उपलब्ध असतात आणि चीन किंवा अन्य देशांकडूनही घेता येतात असे त्यांनी सांगितले.
सरकारने देशाची दिशाभूल केली आहे. महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलवावे. तज्ज्ञ समितीद्वारे देशाच्या संरक्षणविषयक सज्जतेचा आढवा घेतला पाहिजे.
मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष
सरकारने देशातील नागरिकांपुढे वस्तुस्थिती मांडली नाही. चौहान यांच्या वक्तव्यानंतर संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे. नागरिकांना तसेच विरोधकांना विश्वासात घ्यावे. विरोधकांची मागणी सरकार नाकारू शकत नाही.
सागरिका घोष, तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील उपनेत्या
आम्ही केलेल्या डावपेचात्मक चुका समजून घेता आल्या, त्या दुरुस्त केल्या आणि पाकिस्तानातील धावपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले. त्यांच्या सर्व हवाई संरक्षण यंत्रणा आम्ही भेदल्या आणि अचूकपणे हल्ले केले.
जनरल अनिल चौहान, संरक्षण दलप्रमुख