Attck on Delhi CM Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी (२० ऑगस्ट) एका कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला आहे. गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री आवासामधील अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री रेखा गुप्ता साप्ताहिक जनसुनावणी (जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरू केलेला साप्ताहिक उपक्रम) करत होत्या. त्याचवेळी एक तरुण त्याची तक्रार घेऊन तिथे दाखल झाला. तक्रार सांगत असतानाच या तरुणाने मुख्यमंत्री गुप्ता यांच्या कानशिलात लगावली. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दिल्ली भाजपाचे प्रवक्ते प्रवीण शंकर यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की जनसुनावणीदरम्यान एक तरुण मुख्यमंत्री गुप्ता यांच्याजवळ गेला. त्याने आधी काही कागद मुख्यमंत्र्यांकडे दिले. त्यानंतर तो ओरडू लागला. ओरडत असतानाच त्याने मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावली. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वय ३५ वर्षे इतकं आहे. दिल्ली भाजपा या घटनेचा निषेध करते.

दरम्यान, जनसुनावणी बंद व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्र्यांवर हा हल्ला केला असावा, असा संशय भाजपा नेते रमेश बिधुडी यांनी व्यक्त केला आहे.

दिल्ली भाजपा अध्यक्षांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, “आज सकाळी जनसुनावणी चालू असताना रेखा गुप्ता जनतेत मिसळल्या होत्या. त्या लोकांशी बातचीत करत होत्या. त्याचवेळी एक तरुण त्यांच्याजवळ आला. त्याने मुख्यमंत्र्यांना काही कागद दाखवले. मुख्यमंत्री गुप्ता त्या कागदांकडे पाहत असतानाच त्या तरुणाने मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावली. यावेळी कार्यकर्ते व आरोपीमध्ये धक्काबुक्की देखील झाली. धक्काबुक्की चालू असताना मुख्यमंत्र्यांचं डोकं एका टेबलावर आदळलं. दरम्यान, कार्यकर्ते व उपस्थित लोकांनी आरोपीला पकडलं. मुख्यमंत्री आवासातील पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांकडे सोपवलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.”

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणारा आरोपी कोण होता? त्याचं नाव काय? तो कुठून आला होता? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. दरम्यान, वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितलं की “मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. घडलेल्या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्या थोडी विश्रांती घेऊन लवकरच पुन्हा एकदा जनतेत मिसळतील.