पुणे : ‘चीनने आपला कोणताही भाग बळकावलेला नाही,’ असा दावा करून, ‘चीनने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेलगतच्या डोंगराळ भागांत काही ठिकाणी त्यांचे सैन्य वरच्या भागात आणायचा प्रयत्न केला, तर भारतीय सैन्यही त्याला जशास तसे उत्तर देते,’ असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र, सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असल्याचेही त्यांनी मान्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी पुण्यातील निवडक संपादकांशी केलेल्या वार्तालापात चीन सीमेवरील परिस्थितीबाबत भाष्य केले. ‘चीनने केलेल्या अतिक्रमणावर सरकारने काय पावले उचलली, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केली होती. त्याबाबत प्रश्न विचारला असता, जयशंकर म्हणाले, की चीनबरोबर असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर आधी दोन्ही देशांचे सैन्य नव्हते. सीमेवरील डोंगररांगांवर गस्तीसाठी सैन्य आणायचे नाही, असे दोन्ही देशांत ठरलेले असतानाही, सन २०२० मध्ये चीनने काही ठिकाणी आपल्या तुकडय़ा पुढे आणल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून आपणही आपल्या तुकडय़ा पुढे नेल्या आणि त्यातून संघर्ष झाला. त्यानंतर दोन्ही देशांत ही चढाओढ सुरू आहे. ही संवेदनशील बाब असली, तरी लडाखमध्ये काही लडाखी लोक चिनी सैन्याला मदत करीत आहेत, या म्हणण्याला काहीही आधार नाही.

म्यानमारलगत असलेल्या सीमेवर कुंपण घालण्याचे समर्थन करून जयशंकर यांनी तेथे आतापर्यंत असलेल्या मुक्त संचार क्षेत्राचा गैरफायदा घेऊन तेथून अमली पदार्थाची व मानवी तस्करी होत असल्याचे सांगितले. ईशान्य भारताच्या काही भागांना लागून ही सीमा असून, आपल्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी कुंपण घालणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>>“भारताची आण्विक शस्त्रास्रे नष्ट करण्याचा कट”, पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिका, जर्मनी आदी देशांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबत जयशंकर म्हणाले, की त्या देशांत घडणाऱ्या घटनांबाबत आपण बोलायला लागलो, तर त्यांना चालेल का? सध्या या देशांकडून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांसाठी इथले विरोधी नेतेही जबाबदार आहेत. काहीजण केवळ राजकारणासाठी, भारतातील स्थितीबाबत या देशांतील लोकांनी बोलावे म्हणून प्रयत्न करतात, असा आरोपही त्यांनी केला.

काही सनदी अधिकारी, न्यायाधीश, संरक्षण अधिकारी निवृत्त झाल्यानंतर भाजपमध्ये आले आहेत, त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील निर्णयांवर शंका उपस्थित होत नाही का, असे विचारले असता, जयशंकर म्हणाले, की अधिकारी सेवेत असताना त्याचे वैयक्तिक मत काही असले, तरी तो राजकीय भूमिका घेत नसतो. त्यामुळे अशी शंका घेता येणार नाही.

‘कचाथीवूबाबत द्रमुकची भूमिका दुटप्पी’

कचाथीवू बेटाच्या वादाबाबत द्रमुक पक्षाची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोपही एस. जयशंकर यांनी केला. आम्हाला अंधारात ठेवून हे केले गेल्याचा दावा त्या वेळी द्रमुकने केला असला, तरी द्रमुकच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी याला आतून पाठिंबा दिला होता. द्रमुक संसदेत एक बोलत होते आणि करत वेगळेच होते. त्यांचा हा दुटप्पीपणा आम्ही लोकांसमोर मांडतो आहोत, असे जयशंकर म्हणाले.