Govt raises paddy MSP by Rs 69 to Rs 2369 per quintal : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने भाताच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (एमएसपी) प्रति क्विंटल ६९ रुपयांनी वाढ करण्यास मान्यता दिली आहे. ज्यामुळे २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किंमत २,३६९ रुपये झाली आहे. याबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुधारित व्याज अनुदान योजना देखील सुरू ठेवण्यास मंजूरी दिली आहे, ज्यामध्ये सध्या दिले जाणारे १.५ टक्के व्याज अनुदान सुरू ठेवण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इकॉनॉमिक अफेअर्ससंबंधीत मंत्रिमंडळ समितीने (CCEA) घेतला आहे.
कॅबिनेट बैठकीनंतर याबद्दल माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “शेतकर्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरीप पिकांसाठी गेल्या १०-११ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात एमएसपी वाढवण्यात आली आहे. यातच भर टाकत, २०२५-२६ च्या खरीप बाजार हंगामासाठी मंत्रिमंडळाने एमएसपीला मंजूरी दिली आहे. एकूण रक्कम ही २,०७,००० कोटी रुपयांच्या जवळपास असेल. प्रत्येक पीकासाठी झालेला खर्च अधिक ५० टक्के विचारात घेण्यात आला आहे.”
२०२५-२६ वर्षात (जुलै-जून) आगामी खरीप हंगामासाठी सामान्य आणि अ दर्जाच्या वाणांसाठी आधारभूत किंमत अनुक्रमे प्रति क्विंटल ६९ रूपयांनी वाढवून २,३६९ रुपये आणि २,३८९ रुपये प्रति क्विंटल इतकी करण्यात आली आहे.
डाळींसाठी आधारभूत किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तूर डाळीसाठी ती ४५० रूपयांनी वाढवून ८,००० प्रति क्विंटल करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी उडीद डाळीची एमएसपी ४०० रूपयांनी वाढवून ७,८०० प्रति क्विंटल करण्यात आली आहे. मूग डाळीच्या एमएसपीत ८६ रूपयांची वाढ झाली आहे, ती ८७६८ प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
शेतकाम्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा यासाठी खरीप हंगाम २०२५-२६ साठी एमएसपी वाढवण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे. दरम्यान शेतकर्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा सर्वाधिक नफा हा बाजरी (६३ टक्के), मका (५९ टक्के), तूर (५९ टक्के) आणि उडीद (५३ टक्के) या पिकातून मिळेल असा सरकारचा अंदाज आहे. इतर पिकांसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के नफा मिळेल असा अंदाज आहे.