Operation Sindoor : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांना भारताने उद्ध्वस्त केलं. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान, आता भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर एक महत्वाचं पाऊल उचललं आहे.

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा सहभाग असणार आहे. हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांत जाऊन भारताची भूमिका मांडणार आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ७ सदस्यांच्या संसदीय शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे देखील सहभागी असणार आहेत. शशी थरूर यांच्यावर मोदी सरकार ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मंत्री किरेन रिजिजू यांनी काय म्हटलं?

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “सर्वात महत्त्वाच्या क्षणी भारत एकजूट आहे. दहशतवादाच्या विरोधातील आमचा सामायिक संदेश घेऊन ७ सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख भागीदार राष्ट्रांना भेट देतील. राजकारणाच्या आणि मतभेदांच्या पलीकडे राष्ट्रीय एकतेचं हे एक शक्तिशाली प्रतिबिंब असेल”, असं मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे.

शिष्टमंडळाची जबाबदारी कोणत्या नेत्यांवर असणार?

शशी थरूर (काँग्रेस)
रविशंकर प्रसाद (भाजपा)
संजय कुमार झा (जेडीयू)
बैजयंत पांडा (भाजपा)
कनिमोझी करुणानिधी (डीएमके)
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी एसपी)
श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना, शिंदे)

दहशतवादाच्या विरुद्ध शून्य सहिष्णुतेचा भारताचा हा मजबूत संदेश जगापर्यंत पोहोचवण्यासाठी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक शिष्टमंडळात ५ ते ६ खासदार असतील. हे शिष्टमंडळ अमेरिका, युनायटेड किंग्डम, दक्षिण आफ्रिका, कतार आणि संयुक्त अरब अमीरात या सारख्या देशांना भेटी देतील. २२ मे नंतर हा परदेश दौरा सुरू होण्याची शक्यता आहे.

शशी थरूर यांनी काय प्रतिक्रिया दिली?

“अलिकडच्या घटनांबद्दल आपल्या देशाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी पाच प्रमुख देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारने मला आमंत्रित केल्याबद्दल मला सन्मान वाटतो. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझ्या मदतीची आवश्यकता असते, तेव्हा मी मागे राहणार नाही”, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.