भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता समारोपात राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. भाजपा ही एक शक्ती असून त्याविरोधात आपण लढत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. तसंच, शक्ती हा शब्द हिंदू धर्मातील असल्याचंही ते बोलले होते. त्यांच्या या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाचार घेतला. मोदींच्या टीकेनंतर राहुल गांधींनीही त्यांच्या शक्ती शब्दावरून स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी काय म्हणाले होते?

रविवारी शिवाजी पार्कात जनतेला संबोधित करताना राहुल यांनी EVM बाबत आघाडीची चिंता मांडली. ते म्हणाले, “हिंदू धर्मात ‘शक्ती’ हा शब्द आहे. आम्ही एका शक्तीविरोधात लढत आहोत. प्रश्न असा आहे की ती शक्ती काय आहे आणि तिचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? ईव्हीएमपासून अंमलबजावणी संचालनालयापर्यंत देशातील सर्व संस्था मोदी सरकारच्या दबावाखाली आहे.

नरेंद्र मोदींची टीका काय?

राहुल यांनी हिंदू धर्मातील शक्तीच्या पूजनीय व्यक्तिमत्त्वाचा अपमान केल्याचा दावा करून मोदींनी सोमवारी त्यांच्यावर टीकास्र डागलं. “आम्ही भारतात शक्तीची पूजा करत नाही का? आम्ही आमचे चांद्रयान शिवशक्तीला (लँडिंगच्या जागेला दिलेले नाव) समर्पित केले आहे. भाजपासाठी शक्ती ही प्रत्येक स्त्रीचे प्रतीक आहे. माझ्यासमोर शक्ती-स्वरूपातील मुली, महिला, बहिणी आहेत. त्या मला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत. माझ्यासाठी प्रत्येक आई, बहीण, मुलगी शक्तीचे प्रतीक आहे. मी भारत मातेचा भक्त आहे. माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी मी माझ्या प्राणांची आहुती देईन.”

राहुल गांधींचा पलटवार काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवरून त्यांच्या शक्ती शब्दावरून स्पष्टीकरण दिलं आहे. ते पोस्टमध्ये म्हणाले, मोदींना माझे शब्द आवडत नाहीत, ते नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहित आहे की मी सत्य बोललो आहे.

हेही वाचा >> निवडणूक रोख्यांतून ‘या’ पक्षांना मिळाला नाही निधी, यादीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षाचाही समावेश

ज्या शक्तीचा मी उल्लेख केला आहे, ज्या शक्तीशी आपण लढत आहोत, त्या शक्तीचा मुखवटा मोदी आहेत. ही अशी शक्ती आहे की ज्याने आज भारताचा आवाज, भारताच्या संस्था, सीबीआय, आयटी, ईडी, निवडणूक आयोग, मीडिया, भारतीय उद्योग आणि भारताची संपूर्ण घटनात्मक रचना आपल्या तावडीत घेतली आहे. त्याच सत्तेसाठी नरेंद्र मोदीजी भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करतात, तर काही हजार रुपयांचे कर्ज फेडू न शकल्याने एक भारतीय शेतकरी आत्महत्या करतो”, अशी टीका राहुल गांधींनी केली.

“तीच शक्ती भारताच्या बंदरांना, भारतातील विमानतळांना दिली जाते, तर भारताच्या तरुणांना अग्निवीराची भेट दिली जाते, ज्यामुळे त्यांचे धैर्य भंग पावते. त्याच शक्तीला रात्रंदिवस सलाम करत असताना देशातील माध्यमे सत्य दडपून टाकतात. त्याच सत्तेचे गुलाम नरेंद्र मोदी जी देशातील गरिबांवर जीएसटी लादतात, महागाईवर नियंत्रण न ठेवता ती ताकद वाढवण्यासाठी देशाच्या संपत्तीचा लिलाव करतात”, असंही ते म्हणाले.

“मी ती शक्ती ओळखतो, नरेंद्र मोदीही ती ताकद ओळखतात. ती कोणत्याही प्रकारची धार्मिक शक्ती नाही, ती अनीति, भ्रष्टता आणि असत्याची शक्ती आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा मी त्यांच्या विरोधात आवाज उठवतो तेव्हा मोदी आणि त्यांचे खोटे बोलणारे यंत्र नाराज आणि संतप्त होतात”, असा पलटवार त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalgitura on shakti rahul gandhis sharp reply to prime minister narendra modis criticism sgk