Mani Shankar Aiyar on Rajiv Gandhi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विधानामुळे नवनव्या वादांना तोंड फुटल्याचंही अनेकदा पाहायला मिळालं. आता मणिशंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे मणिशंकर अय्यर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मणिशंकर अय्यर यांनी कोणत्याही दुसऱ्या पक्षातील नेत्यांवर टीका केली नाही, तर त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे दिवंगत राजीव गांधी यांच्याबाबत एक विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजीव गांधी यांची जेव्हा पंतप्रधानपदी निवड झाली होती, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटलं होतं. कारण दोनदा अपयशी झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?, असं विधान मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. एवढंच नाही तर राजीव गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भातही मणिशंकर अय्यर यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले. दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्सवर (ट्वीटर) शेअर केला आहे. तसेच मणिशंकर अय्यर यांनी राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियानेही दिलं आहे.

मणिशंकर अय्यर यांनी नेमकं काय म्हटलं?

“जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले होते, तेव्हा मला वाटलं की एअरलाइन पायलट असलेली व्यक्ती आणि दोनदा अपयशी ठरलेली व्यक्ती पंतप्रधान कशी होऊ शकते? मी त्याच्याबरोबर केंब्रिज विद्यापीठात शिकलो. केंब्रिज विद्यापीठात नापास होणं कठीण आहे. कारण त्या विद्यापीठात किमान प्रत्येकजण उत्तीर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही राजीव गांधी हे अपयशी ठरले. यानंतर ते लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये गेले. आता त्या ठिकाणी देखील ते अपयशी झाले. तेव्हा मला असं वाटलं की, दोनदा अपयशी झालेला माणूस देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो?”, असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या या विधानानंतर काँग्रेसने प्रतिक्रिया देत मणिशंकर अय्यर यांना निराश व्यक्ती म्हणून संबोधलं आहे. काँग्रेस नेते हरीश रावत यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मी निराश व्यक्तीवर भाष्य करू इच्छित नाही. राजीव गांधींनी देशाला आधुनिक दृष्टीकोन दिला. त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासाठीही ठोस पावले उचलली. पण हे दुर्दैव आहे की पक्षाचा एक भाग (काँग्रेस) त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही, नाही तर देशाचा इतिहास वेगळा असता, असं काँग्रेस नेते हरीश रावत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mani shankar aiyar on former prime minister rajiv gandhi how can a man who has failed twice become the prime minister gkt