manipur cm biren singh apologises for Violence : मागील बऱ्याच दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावरून केंद्र सरकारला कायम लक्ष्य केले जाते. यादरम्यान आज (३१ डिसेंबर) वर्षाच्या शेवटच्या दिवशी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर खेद व्यक्त करत माफी मागितली आहे. ३ मे २०२३ पासून मणिपूरमध्ये हिंसाचार होत असून यामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे तर हजारो लोक बेघर झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केले, ते म्हणाले की, “हे संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी होते. मला खेद वाटतो आणि गेल्या ३ मे पासून आजपर्यंत जे काही घडत आहे त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागू इच्छितो”. मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की घटनांमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे आणि अनेकांना आपले घर सोडून जावे लागले. “मला याचा खूप खेद वाटतो. मला सर्वांची माफी मागायची आहे”.

मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यात शांतता निर्माण करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रगती झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला की नवे वर्ष २०२५ पासून मणिपूरमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती परत येईल. राज्यातील सर्व समुदायांना आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले की, “जे काही झालं ते झालं. आता आपण भूतकाळातील चुका माफ करून त्या विसरल्या पाहिजेत आणि आपल्याला एक नवीन जीवन, शांत मणिपूर, समृद्ध मणिपूरची सुरूवात करावी लागेल. सर्व मान्यता मिळालेल्या ३४-३५ जमातींसोबत एकत्र राहण्याची आणि भविष्यातही एकत्र राहायला हवे,”

“मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे आणि चर्चा आणि संवाद हाच त्याचा एकमेव मार्ग आहे, ज्याच्यासाठी केंद्र सरकारने आधीच पुढाकार घेतला आहे.” असेही मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग इम्फाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

३ मे २०२३ पासून मणिपूरमध्ये आरक्षण आणि आर्थिक लाभावरून बहुसंख्य मेईतेई आणि कुकी समुदाय यांच्यात हिसंचार सुरू आहे. या हिंसाचारात २०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पुढे बोलताना सांगितले की, आतापर्यंत एकूण सुमारे २०० लोक हिंसाचारात मारले गेले आहेत आणि सुमारे १२,२४७ एफआयआर नोंदवले गेले आहेत. तसेच ६२५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर सुमारे ५,६०० शस्त्रे आणि स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा>> संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; म्हणाले, “गुंडांचे राज्य…”

राज्याचे प्रश्न हाताळण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. केंद्र सरकारने विस्थापित कुटुंबांना मदत करण्यासाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी आणि पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. व्यक्तींसाठी नवीन घरे बांधण्यासाठी पुरेसा निधी देण्यात आला आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur cm biren singh apologises for violence in state ethnic conflict marathi news rak