New CJI Justice B R Gavai: न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई अर्थात बी. आर. गवई यांनी नुकतीच देशाचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. न्यायमूर्ती गवई हे २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत देशाच्या सरन्यायाधीशपदी राहतील. त्यांच्या निवृत्तीमुळे देशाला पुन्हा एकदा नव्या सरन्यायाधीशांचा शपथविधी करावा लागेल. यावेळी पहिल्यांदाच देशाला महिला सरन्यायाधीश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण त्यांचा कार्यकाळ अवघा ३६ दिवस असू शकतो. सरन्यायाधीशांच्या निवडीसंदर्भातले निकष यासाठी कारणीभूत ठरणार आहेत. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
न्यायमूर्ती गवईंचा शपथविधी
न्यायमूर्ती बी. आर. गवईंनी बुधवारी १४ मे रोजी देशाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी न्यायमूर्ती गवई सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. मात्र, याचप्रमाणे जेव्हा सरन्यायाधीश गवई निवृत्त होतील, तेव्हा त्यांच्याजागी अशाच प्रकारे नव्या सरन्यायाधीशांची निवड करावी लागणार आहे. यासाठी विद्यमान सरन्यायाधीश कलोजियममध्ये यासंदर्भातील नावाचा प्रस्ताव ठेवतात आणि कलोजियमच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जातो.
पुढच्या सरन्यायाधीश न्यायमूर्ती नागरत्ना होणार?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असणाऱ्या न्यायमूर्तींमध्ये सेवाज्येष्ठता हा सरन्यायाधीशपदासाठी महत्त्वाचा निकष मानला जातो. त्यानुसारच न्यायमूर्ती गवईंची या पदासाठी प्रामुख्याने निवड केली गेली. त्यामुळे न्यायमूर्ती गवईंनंतर सेवाज्येष्ठतेनुसार सर्वात वरीष्ठ न्यायमूर्तींचीच सरन्यायाधीशपदासाठी निवड होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. असं झाल्यास न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना या देशाच्या सरन्यायाधीशपदी बसू शकतात.
फक्त ३६ दिवसांचा कार्यकाळ!
दरम्यान, न्यायमूर्ती नागरत्ना देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांना अवघा ३६ दिवसांचा कार्यकाळ या पदावर राहता येणार आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे २३ नोव्हेंबरपासून ३६ दिवसांनंतर देशाला पुन्हा एकदा नवे सरन्यायाधीश मिळू शकतील. स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेल्या ७५ वर्षांत आजतागायत एकही महिला न्यायमूर्ती देशाच्या सरन्यायाधीश झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयात फक्त ११ महिलांनी न्यायमूर्ती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
एक वर्षाहून कमी कारकिर्द राहिलेल्या माजी सरन्यायाधीशांची यादी…
न्यायमूर्तींचे नाव | दिवस | कार्यकाळ |
कमल नरेन सिंग | १७ | २५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर १९९१ |
एस. राजेंद्रबाबू | ३० | २ मे ते १ जून २००४ |
जे. सी. शाह | ३५ | १७ डिसेंबर १९७० ते २१ जानेवारी १९७१ |
जी. बी. पटनायक | ४० | ८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २००२ |
उदय लळित | ७३ | २८ ऑग. ते ९ नोव्हें. २०२२ |
ललित मोहन शर्मा | ८५ | १८ नोव्हेंबर १९९२ ते ११ फेब्रुवारी १९९३ |
अमल कुमार सरकार | १०५ | १६ मार्च ते २९ जून १९६६ |
आर. एम. लोढा | १५३ | २७ एप्रिल ते २७ सप्टें. २०१४ |
ई. एस. वेंकटरामय्या | १८१ | १९ जून ते १७ डिसेंबर १९८९ |
सॅम पिरोज भरुचा | १८५ | १ नोव्हें. २००१ ते ५ मे २००२ |
संजीव खन्ना | १८६ | ११ नोव्हे. २०२४ ते १३ मे २०२५ |
जगदीश सिंग खेहार | २३५ | २ जाने. ते २७ ऑग. २०१७ |
मदन मोहन पंछी | २६४ | १८ जाने. ते ९ ऑक्टो. १९९८ |
पी. सदाशिवम | २८१ | १९ जुलै २०१३ ते २६ एप्रिल २०१४ |
सब्यसाची मुखर्जी | २८१ | १८ डिसेंबर १९८९ ते २५ सप्टें. १९९० |
के. सुब्बा राव | २८५ | ३० जून १९६६ ते ११ एप्रिल १९६७ |
अल्तमस कबीर | २९२ | २९ सप्टें. २०१२ ते १८ जुलै २०१३ |
जे. एस. वर्मा | २९८ | २५ मार्च १९९७ ते १७ जाने. १९९८ |
कैलास नाथ वांचू | ३१८ | १२ एप्रिल १९६७ ते २४ फेब्रु. १९६८ |
मधुकर कनिया | ३४० | १३ जिसेंबर १९९१ ते १७ नोव्हें. १९९२ |
मेहरचंद महाजन | ३५२ | ४ जानेवारी ते २२ डिसें. १९५४ |
सर्वात कमी काळ सरन्यायाधीशपदी कोण होतं?
न्यायमूर्ती नागरत्ना या फक्त ३६ दिवसांसाठी सरन्यायाधीशपदी राहणार असल्या, तरी हा सरन्यायाधीशपदाचा सर्वात कमी काळ नाही. न्यायमूर्ती कमल नरेन सिंह हे सर्वात कमी काळ म्हणजे अवघे १७ दिवस देशाच्या सरन्यायाधीशपदी राहिले आहेत. दुसरीकडे न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल ७ वर्षं १३९ दिवस सरन्यायाधीशपदाचा कार्यभार सांभाळला आहे.