P Chidambaram : लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली. त्यानंतर इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधक लोकसभा निवडणुकीला समोरे गेले. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावं लागलं. दरम्यान, आता याच इंडिया आघाडीच्या भवितव्याबात प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी इंडिया आघाडीबाबत चिंता व्यक्त केली आहे. इंडिया आघाडी पूर्णपणे अबाधित राहिली तर आनंद होईल. पण इंडिया आघाडी तुटत चालल्याचं दिसतंय, असं विधान पी.चिदंबरम यांनी केलं आहे. सलमान खुर्शीद आणि मृत्युंजय सिंह यादव यांच्या कॉन्टेस्टिंग डेमोक्रॅटिक डेफिसिट या पुस्तकाच्या प्रकाशनच्या प्रसंगी बोलताना पी.चिदंबरम यांनी हे विधान केलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडीत महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यानेच अशा प्रकारचं विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पी चिदंबरम काय म्हणाले?

“इंडिया आघाडी पूर्णपणे अबाधित राहिली तर आनंद होईल. मात्र, इंडिया आघाडी अजूनही एकत्र ठेवता येऊ शकते”, असं म्हणत पी. चिदंबरम यांनी इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, “मृत्युंजय सिंह यादव यांनी म्हटल्याप्रमाणे इंडिया आघाडीचे भवितव्य तितके उज्ज्वल नाही. आघाडी अजूनही अबाधित आहे याची मला खात्री नाही. याचं उत्तर फक्त सलमान खुर्शीद हेच देऊ शकतात. कारण ते इंडिया आघाडीच्या वाटाघाटीचा एक भाग होते”, असं पी चिदंबरम यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

‘भाजपा सारखा मजबूत पक्ष नाही’

“यादव यांनी सांगितल्याप्रमाणे अधोरिखीत करण्याची आवश्यकता म्हणजे की, भारतीय जनता पार्टी एक मशीन आहे. कारण जर तुम्हाला समजायचं असेल माझ्या अनुभवानुसार भाजपा एवढा मजबूत आणि संघटीत दुसरा कोणताही पक्ष नाही. त्यामुळे इंडिया आघाडी मजबूत कशी राहील याचा विचार करावा लागेल”, असंही पी चिदंबरम यांनी म्हटलं.

सलमान खुर्शीद काय म्हणाले?

“इंडिया आघाडीशी संबंधित काही मुद्दे आहेत, ज्यांचं निराकरण करणं गरजेचं आहे. ही चिंता दूर करण्याची गरज आहे. चिदंबरम यांच्या विचारांवरून आपल्याला २०२९ मध्ये होणाऱ्या एका मोठ्या लढाईसाठी तयार राहावं लागेल. आघाडीत असलेल्यांना एकत्र कसं आणायचं याचा आपल्याला सामना करावा लागेल”, असं सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे.

“जर निवडणुकीच्या कलांमध्ये मोठ्या प्रमाणात उलटफेर करायचा असेल तर विरोधी पक्षांना मोठ्या प्रमाणावर विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण याबाबत विचार केला पाहिजे. जर आपण फक्त किती जागा लढवणार आणि निकाल आल्यानंतर काय होईल? याचा विचार केला तर आपण जे ठरवलं आहे ते देखील गमावून बसू”, असं सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे.