ओडिशातील रेल्वे अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेत झालेल्या विचित्र अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ९०० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांच्याबरोबर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोदींनी कॅबिनेट मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करत जखमींना आणि कुटुंबीयांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा : “देवाने दुसरा जन्मच दिला, आम्ही..” अपघातातून वाचलेल्या कुटुंबाने मानले देवाचे आभार

पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. त्यानंतर बोलताना पंतप्रधान भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान मोदी म्हणाले, “ही दुर्दैवी घटना असून, मनाला विचलित करणार अपघात आहे. जखमींच्या उपचारासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झालाय, त्यांना परत आणू शकत नाही. पण, सरकार कुटुंबीयांच्या दुख:त सहभागी आहे.”

हेही वाचा : ओडिशातील रेल्वे अपघाताबाबत माजी रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केली मोठी शंका; म्हणाले, “हा एक…”

“सरकारसाठी ही घटना अत्यंत गंभीर आहे. सर्व तपासाचे निर्देश दिले आहेत. दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार आहे. त्यांना सोडणार नाही. ओडिशा सरकार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या माध्यमातून लोकांची मदत केली. येथील नागरिकांनाही संकटकाळात रक्तदान आणि बचावकार्याचं काम केलं,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi say deeply saddened by odisa railway accident whoever found guilty not spared ssa