पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत हा अतिरिक्त धान्य उत्पादन करणारा देश आहे आणि जागतिक अन्न आणि पोषण सुरक्षेत उपाय प्रदान करण्यासाठीही कार्य करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. कृषी क्षेत्र हे भारताच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी आहे. नुकताच सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शाश्वत आणि हवामानास अनुकूल शेतीला मोठा आधार देण्यात आला आहे. तसेच भारतीय शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संपूर्ण व्यवस्था विकसित केल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

भारतात तब्बल ६५ वर्षांनी आयोजित केलेल्या ३२ व्या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत (आयसीएई) पंतप्रधान मोदी बोलत होते. नवी दिल्लीतील एनएएससी कॉम्प्लेक्समधील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृहात शनिवारी सकाळी आयोजित केलेल्या या परिषदेत ७० देशांतील सुमारे एक हजारहून अधिक प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली. ‘एक काळ असा होता जेव्हा भारताची अन्नसुरक्षा जगासाठी चिंतेची बाब होती. आता भारत जागतिक अन्न सुरक्षा आणि जागतिक पोषण सुरक्षेत उपाय सुचवण्यासाठी काम करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी या वेळी नमूद केले. यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान, निती आयोगाचे सदस्य रमेश चंद, परिषदेचे अध्यक्ष मतीन क्यूम उपस्थित होते.

हेही वाचा >>>“आई-बाबा सॉरी, हे हॉस्टेलवाले…”, UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या!

‘विश्व बंधू’वर प्रकाश

मोदी यांनी जागतिक कल्याणासाठी ‘विश्व बंधू’ म्हणून भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ आणि ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ यासह विविध मंचांवर मांडलेल्या विविध मंत्रांवर मोदी यांनी प्रकाश टाकला. शाश्वत शेती आणि अन्न व्यवस्थेपुढील आव्हाने केवळ ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या सर्वांगीण दृष्टिकोनातून हाताळली जाऊ शकतात, असे मोदींनी अधोरेखित केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister modi asserted that efforts should be made for global food security measures amy