पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘गरीब, मध्यमवर्गीयांना आशीर्वाद मिळावा यासाठी मी देवी लक्ष्मीला प्रार्थना करतो. ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवा आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण होईल,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांनी संसद भवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. गरीब, मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्प फायदेशीर असल्याचे संकेत पंतप्रधानांनी दिले.

‘‘आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी मी समृद्धीची देवी, लक्ष्मीमातेला नमन करतो. अशा वेळी लक्ष्मी मातेचे स्मरण करणे ही आपली जुनी परंपरा आहे. आई लक्ष्मी गरीब, मध्यम वर्गावर विशेष कृपा ठेवेल,’’ असे पंतप्रधान म्हणाले.

देशाच्या आर्थिक घडामोडींचा मार्ग नावीन्य, समावेश आणि गुंतवणूक या तत्त्वांवर तयार करण्यात आल्याचे मोदींनी स्पष्ट केले. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयके मांडली जातील आणि देशाला बळकट करण्यासाठी व्यापक चर्चेनंतर कायदे बनतील. विशेषत: महिलांना समान अधिकार मिळावेत आणि कोणताही सांप्रदायिक किंवा धार्मिक आधारावरील भेदभाव दूर केला जावा यासाठी या अधिवेशनादरम्यान महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आपल्याला जलद गतीने विकास साधायचा आहे. त्यामुळे सुधारणेवर जास्तीत जास्त भर देणे आवश्यक आहे. आपला तरुण देश आहे… आज २०-२५ वर्षांचे तरुण, जेव्हा ४५-५० वर्षांचे होतील, तेव्हा ते विकसित भारताचे सर्वात मोठे लाभार्थी असतील. त्यांच्या वयाच्या त्या टप्प्यावर ते धोरण बनवण्याच्या व्यवस्थेत त्या जागी बसतील… ते अभिमानाने विकसित भारताबरोबर पुढे जातील, असे पंतप्रधान म्हणाले.

प्रथमच व्यत्यय आणण्याचे परदेशातून प्रयत्न नाहीत’

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी २०१४ नंतर पहिल्यांदाच परदेशातून भारतात संसदीय कामकाजात व्यत्यय आणण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, असे अधोरेखित करत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना फटकारले. २०१४ पासून प्रत्येक अधिवेशनापूर्वी गैरप्रकार करण्यात परदेशातील काही जण तयार असतात आणि अशा प्रयत्नांना चालना देणाऱ्यांची येथे कमतरता नाही, अशी टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली. प्रथमच परदेशातून आग लावण्याचा प्रयत्न झाला नाही. देशाच्या वाढत्या स्थिरतेचे हे चिन्ह असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

२०४७ पर्यंत ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट साध्य करायचे असून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे नवा आत्मविश्वास आणि ऊर्जा मिळेल. त्यांचे सरकार तिसऱ्या कार्यकाळात सर्वांगीण विकासासाठी ‘मिशन मोड’मध्ये काम करत आहे.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi optimism before the budget amy