Rohini Acharya : बिहार निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘यादवी’ माजल्याचं चित्र आहे. तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पडली आहे. लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीझ यांनीच आपल्याला कुटुंबातून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे.
बिहार निवडणुकीचा निकाल काय?
भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दलाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जबरदस्त कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. एनडीएने जिंकलेल्या २०२ जागांपैकी भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) लढवलेल्या २९ जागांपैकी १९ जागा जिंकल्या, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या. त्यामुळे विरोधकांचं अक्षरशः पानिपत झालं. त्यामुळे राजद म्हणजेच राष्ट्रीय जनता दलात कमालीची अस्वस्थता आहे.
रोहिणी आचार्य नेमकं काय म्हणाल्या?
“माझं आता कुठलंही कुटुंब नाही. तुम्ही मला प्रश्न विचारु नका. तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीज यांना प्रश्न विचारा. माझं आता कुटुंब नाही. मला या तिघांनी कुटुंबातून हाकललं आहे. कारण या तिघांनाही जबाबदारी घ्यायची नाही. सगळं जग म्हणतं आहे जो चाणक्य असेल त्याला तुम्ही प्रश्न विचारणार का? कार्यकर्ता चाणक्याला प्रश्न विचारतो आहे. सगळा देश चाणक्याला प्रश्न विचारतो आहे की पक्षाची अशी अवस्था का झाली? संजय, तेजस्वी आणि रमीझ यांचं नाव घेतलं तर तु्म्हाला घरातून हाकललं जाईल, बदनाम केलं जाईल, तुम्हाला चपलेने मारलं जाईल.” अशी संतप्त प्रतिक्रिया रोहिणी आचार्य यांनी पाटणा विमानतळावर दिली आहे.
रोहिणी आचार्य यांची पोस्ट काय?
रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मी माझ्या कुटुंबीयांशीही सर्व संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. मी जो काही निर्णय घेतला आहे त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे.”
कोण आहेत रोहिणी आचार्य?
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या माजी सदस्य आहेत. काही वर्षांपूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केल्यामुळे चर्चेत आलेल्या रोहिणी आचार्य यांनी गेल्या वर्षी सारण येथून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना अपयश आले होते. त्यांना भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
