Sanjay Raut Speech in Parliament: “पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर २६ लोक मारले गेले. आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले. याची जबाबदारी कुणाची? पंडीत नेहरू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा उपाध्यक्ष जेडी व्हान्स याबद्दल राजीनामा देणार का? केंद्रीय गृहमंत्र्यांची ही जबाबदारी असून त्यांनीच राजीनामा द्यायला हवा. तुमचे ऐकले गेले नाही म्हणून देशाच्या उपराष्ट्रपतींचा २४ तासांत राजीनामा घेता, पण पहलगाममध्ये २६ लोक मारले गेले तरी कुणाचाही राजीनामा घेतला गेला नाही”, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना केली.
संसदेत सध्या ऑपरेशन सिंदूर विषयावर चर्चा सुरू आहे. लोकसभेत सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस चर्चा झाली. मंगळवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिले. त्यानंतर आज राज्यसभेतही यावर सर्वपक्षीय खासदारांनी आपापली मते व्यक्त केली.
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले, “पंतप्रधान मोदी स्वतःला देवाचा अवतार मानतात. त्यांचे भक्तही त्यांना ईश्वराचा अवतार मानतात. मोदी म्हणतात, मी वेळेआधी वेळेचा अंदाज घेतो, ही माझ्यावर देवाची कृपा आहे. मग काही दहशतवादी पहलगाम येथे घुसून २६ पर्यटकांना मारणार आहे, हे मोदींना कळले नाही का? हा आमच्यासमोर प्रश्न आहे.”
सरदार पटेल १० वर्ष जगले असते तर…
“कालपासून सभागृहात भाजपा नेत्यांच्या भाषणात पंडित नेहरूंचा वारंवार उल्लेख झाल्याचे ऐकले. त्यांना पंडित नेहरू, सरदार पटेल यांची आठवण येत आहे. पंडित नेहरू तर भाजपाच्या नेत्यांना झोपूही देत नाहीत आणि जगूही देत नाहीत. नेहरू तर महान होतेच. पण सरदार पटेलही मोठे नेते होते. आपण त्यांना लोहपुरूष म्हणतो. सरदार पटेल पहिले नेते होते, ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. सरदार पटेल आणखी १० वर्ष जगले असते तर आज सभागृहात समोर बसलेले लोक दिसलेही नसते”, असे विधान संजय राऊत यांनी केले.
भाजपाने पंडित नेहरूंचे आभार मानले पाहिजेत
सरदार पटेल आणखी काही काळ असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आजीवन बंदी घातली असती. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी पंडित नेहरूंचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्यामुळेच आज तुम्ही इथे बसला आहात. सरदार पटेल जर पंतप्रधान झाले असते तर आज दिसणारे भाजपाचे नेते देशात दिसले नसते, अशीही टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शस्त्रविराम करण्यासाठी जेव्हा पाकिस्तान आमच्यासमोर गुडघे टेकत होता. हात जोडून जर विनंती करत होता. शस्त्रविराम करायचा होता, तर त्याबदल्यात भारताला काय मिळाले. पीओकेवर चर्चा झालीच नाही. तर कमीतकमी आपले कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत, त्यांना तरी सोडवायला हवे होते. १५ वर्षांपासून कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. अनेक मच्छिमार पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांना सोडवून घ्यायला हवे होते.