देशाची सुरक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत असून काँग्रेसला हे आवडत नाही आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राजस्थानमध्ये प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी, काँग्रेस स्वत:ची खिल्ली उडवून घेत आहे. काँग्रेस विचारणा करत आहे की निवडणुकीच्या वेळीच हा निर्णय का घेण्यात आला. हा काय मोदींच्या कॅबिनेटने निर्णय घेतला आहे का ? असा सवाल नरेंद्र मोदींनी यावेळी विचारला.

‘आधी संयुक्त राष्ट्राने काँग्रेसला विचारायला हवं होतं की, मॅडमजी तुम्ही ज्यांना साहेब म्हणून बोलवता त्यांना आम्ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करु का ? तुम्हाला काही समस्या तर नाही ना’, असा टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे. निवडणूक सुरु आहेत आणि दुसरीकडे अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती मोदींना पुरस्कार देत आहेत आणि यामुळे काँग्रेस चिंताग्रस्त आहे असंही यावेळी नरेंद्र मोदींनी म्हटलं.

‘दोन दिवसांपूर्वी भारताचा मोठा शत्रू मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं. पाकिस्तानात बसलेला हा दहशतवादी भारताला एकामागून एक जखमा देत होता. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या मंसुब्यांवर ही तिसरी मोठी स्ट्राइक आहे’, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

‘अशा दहशतवाद्यांशी लढा देताना राजस्थानमधील अनेक मातांनी आपली शूर मुलं गमावली आहेत. पण आता दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये राहणंही मुश्किल झालं आहे. जेव्हा काँग्रेस सरकार केंद्रात होतं तेव्हा दहशतवादी हल्ला होणं नित्याचं झालं होतं. त्यांच्या कार्यकाळात कोणतंही शहर सुरक्षित नव्हतं. 2008 मध्ये दहशतवाद्यांनी कशा पद्धतीने मुंबईवर हल्ला केला हे सर्वांनाच माहिती आहे. मुंबईत जे झालं ते पहिलं आणि शेवटचं नव्हतं’, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

नरेंद्र मोदींनी यावेळी झालेल्या हल्ल्यांची यादीच वाचून दाखवली. जानेवारी 2008 मध्ये उत्तर प्रदेशात सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला झाला होता. मे महिन्यात जयपूरमध्ये बॉम्ब ब्लास्ट, जुलै महिन्यात बंगळुरुत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत दोन दहशतवादी हल्ले झाले. ऑक्टोबर महिन्यात गुवाहाटी, अगरताला आणि इंफाळमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

‘सध्याचा तरुण आयपीएलमध्ये प्रचंड रस घेत आहे. मात्र आजपर्यंत दोनदा असं झालं आहे की आयपीएल भारतात नाही तर भारताबाहेर दक्षिण आफ्रिकेत खेळवला गेला होता. 2009 आणि 2014 मध्ये हे झालं होतं. केंद्रातील सरकारला दहशतवाद्यांची प्रचंड भीती वाटत होती. सरकारडे अजिबात हिंमत नव्हती. दोन्ही वेळी सध्या निवडणूक असल्याने पोलीस व्यस्त असल्याचं कारण त्यांनी दिलं होतं. आजही निवडणूक सुरु आहे. नवरात्री, रामनवमी आणि हनुमान जयंतीदेखील आहे. रमजान सुरु होणार आहे. पण तरीही आयपीएल खेळवलं जात आहे. हे शेपुट लपवून पळणाऱं सरकार होतं, मी निधड्या छातीने समोर जातो’, असंही नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.