पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांसह मंगळवारी (१९ सप्टेंबर) देशाच्या नव्या संसदेत प्रवेश केला. नव्या संसदेतील पहिल्याच भाषणात पंतप्रधानांनी महिला अरक्षण विधेयक सादर केलं. या विधेयकावर कालपासून लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा सुरू आहे. आज सकाळी या विषयावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तसेच हे विधेयक सर्वात आधी राजीव गांधी यांनी सादर केलं होतं, याची सभागृहाला आठवण करून दिली. दरम्यान, महिला अरक्षण विधेयकावरून काँग्रेस आणि भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनिया गांधी यांनी महिला अरक्षण विधेयकाबाबत बोलताना देशातील महिलांचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान आणि त्यानंतरही राजकीय क्षेत्रात त्यांच्यावर होणारा अन्याय या गोष्टी अधोरेखित केल्या. सोनिया गांधी म्हणाल्या, भारतीय स्त्रियांच्या मनात महासागराइतका संयम आहे. भारतीय स्त्रीने तिच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार केली नाही. केवळ स्वतःच्या फायद्याचा कधी विचार केला नाही. तिने नदीप्रमाणे सर्वांचं भलं करण्याचं काम केलं आणि अडचणीच्या काळात हिमालयाप्रमाणे उभी राहिली. तिच्या धैर्याचा अंदाज लावणं अवघड आहे. आराम काय असतो ते तिला माहितीच नाही. परंतु, तिला राजकीय क्षेत्रात तितका आदर मिळाला नाही.

सोनिया गांधी म्हणाल्या, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, अरुणा असफ अली, विजयलक्ष्मी पंडित, राजकुमारी अमृत कौर आणि त्यांच्याबरोबर लाखो महिलांनी देशासाठी योगदान दिलं. अडचणीच्या काळात या स्त्रियांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मौलाना आझाद यांची स्वप्नं सत्यात उतरवली. माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व यातलंच एक मोठं उदाहरण आहे.

हे ही वाचा >> “महिला आरक्षण विधेयकाला आमचा पाठिंबा, पण…”, सोनिया गांधींनी लोकसभेत मांडली काँग्रेसची भूमिका

सोनिया गांधी म्हणाल्या, आज माझ्या आयुष्यातला मोठा मार्मिक क्षण आहे. देशात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांची भागीदारी निश्चित करणारं संविधान संशोधन विधेयक माझे पती आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत मांडलं होतं. परंतु, राज्यसभेत ते सात मतांनी पडलं. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने ते विधेयक पारित केलं. त्यामुळेच आज आपल्या देशात स्थानिक पातळीवर निवडून आलेल्या १५ लाख महिला आहेत. त्यामुळे राजीव गांधी यांचं अर्ध स्वप्न पूर्ण झालं आहे. आता हे विधेयक पारित झाल्यावर त्यांचं स्वप्न पूर्ण होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi says my partner rajiv gandhi proposed women reservation in local government bodies asc