three dead after being Stuck in 32-hour traffic jam : देशातील वेगवेगळ्या शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशातील इंदूर-देवास महामार्गावर सुमारे ८ किमी लांबीच्या मोठ्या वाहतूक कोंडीत अडकून गुरूवार आणि शुक्रवार दरम्यान ३० तासांत किमान तीन जणांचा मृत्यू झाला.

ही वाहतूक कोंडी गुरुवारी संध्याकाळी सुरू झाली आणि शुक्रवारी रात्रीपर्यंत राहिली. या वाहतूक कोंडीमुळे ४,००० हून अधिक वाहने या मार्गावर अडकून पडली होती. या प्रकारामुळे शहरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थापन व्यवस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्या जात आहेत.

प्राथमिक माहितीनुसार ही वाहतूक कोंडी ही प्रामुख्याने महामार्गाचे काम सुरू असल्याने आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने झाली होती असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.

वाहतूक ही एका लहान सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. जवळपासच्या गावांमधून पर्यायी मार्ग नसल्याने परिस्थिती अत्यंत बिकट बनली.

वाहतूक कोंडीतील पहिला बळी हे संदीप पटेल (३२) ठरले, यांना रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत हृदयविकाराचा झटका आला.

संदीप यांच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले जात होते, परंतु गाडी वाहतूक कोंडीत अडकली आणि त्यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.

याबरोबरच कमल पांचाल (६२) आणि बलराम पटेल (५५) यांच्या देखील मृत्यूची नोंद झाली आहे. “आम्ही दीड तास वाहतूक कोंडीत अडकलो होते. यादरम्यान मा‍झ्या वडीलांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यांनी जड वाटत असल्याची तक्रार केली आणि त्यांना कारमध्येच चक्कर आली. त्यांना देवास येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले,” असे कमल यांचा मुलगा विजय पांचाल यांनी सांगितले.

यादरम्यान इंदोरचे कलेक्टर आशीष सिंह यांनी एनएचएआय, आयएमसी, वाहतूक पोलिस आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकार्‍यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले. दरम्यान या वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे.

“बायपासवर गेल्या काही दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांवर आणि पोलिसांवर कारवाई करावी,” असे काँग्रेस प्रवक्ते अमित चौरसिया म्हणाले आहेत.