Lashkar-e-Taiba Terrorist Saifullah Khalid Killed: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याचा खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत त्याला ठार केल्याची माहिती समोर आली आहे. अबू सैफुल्लाह हा भारतातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार होता. या संदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह हा आज पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधून आज दुपारी त्याच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर एका क्रॉसिंगजवळ अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आणि गोळ्या झाडत हत्या केली. दरम्यान, २००१ मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ छावणीवर हल्ला, २००५ मध्ये बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेसवर हल्ला आणि २००६ मध्ये नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावरील हल्ला असा तीन हल्ल्याचा अबू सैफुल्लाह सूत्रधार होता. अबू सैफुल्लाह याने या तीनही हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारख्या मोठ्या दहशतवाद्यासह तब्बल १०० दहशतवाद्यांना ठार केलं. त्यानंतर काही दिवसांतच लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. मात्र, अबू सैफुल्लाह याच्यावर नेमकी गोळ्या कोणी झाडल्या? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अबू सैफुल्लाह हा लष्कर-ए-तोयबाचं काम करायचा. गेल्या काही दिवसांपासून तो नेपाळमध्ये सक्रीय होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. अबू सैफुल्लाह हा अनेक अतिरेकी संघटनाच्या कृत्यांमध्ये आर्थिक सहाय्य करत होता अशी देखील माहिती सांगितली जाते. तसेच अबू सैफुल्लाह याने नेपाळमधून भारतावर अनेक दहशतवादी हल्ले केल्याचं सांगितलं जातं.

ऑपरेशन सिंदूरमध्ये किती दहशतवादी मारेल गेले?

दरम्यान, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त केले. एकूण ९ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती भारतीय लष्कराने दिलेली आहे.