Tulsibaug Pune : पुण्यात कोणालाही ‘तुळशीबाग’विषयी विचारले तर तुम्हाला एकच उत्तर मिळेल ते म्हणजे खरेदीचं ठिकाण. काही वर्षांपूर्वी लोक फक्त देव दर्शनासाठी तुळशीबागेत जायचे पण आता तुळशीबागेत जाणे म्हणजे खरेदीसाठी जाणे असे मानले जाते. दागिने. कपडे, खेळणी, गृहपयोगी वस्तू, अशा अनेक गोष्टींची बाजारपेठ म्हणून तुळशीबाग ओळखली जाते. पुणे दर्शनासाठी येणारी व्यक्ती सुद्धा तुळशीबागला न चुकता भेट देते. विशेष म्हणजे हे महिलांचे आवडते ठिकाण आहे पण तुम्ही कधी विचार केला का या ठिकाणाला तुळशीबाग नाव का व कसे पडले? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

तुळशीबाग नाव का व कसे पडले?

तुळशीबाग या नावामागे श्रीमंत नारो आप्पाजी खिरे यांचा खूप मोलाचा वाटा आहे. लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ‘नावामागे दडलंय काय?’ या पुस्तकात सांगतात, “गुरुवार पेठ या परिसरात त्यावेळेस अनेक बागा होत्या. नारो आप्पाजीनी सरदार खाजगीवाल्यांच्या बागेतील एक एकराचा तुकडा घेऊन तेथे राम मंदिर बांधायचे ठरविले. बागेच्या त्या तुकड्यावर तेव्हा तुळशीची बाग होती. म्हणून या देवळाच्या परिसराला नाव पडले ‘तुळशीबाग’. त्यांनी तुळशीबाग संस्थान स्थापन केले”
या परिसराला तुळशीबाग म्हणतात. या ठिकाणी आता विविध दुकाने वाढलेली आहेत त्यामुळे आता ही जागा फक्त राम मंदिरासाठी नाही तर बाजारपेठ म्हणून सुद्धा ओळखली जाते.

हेही वाचा : Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास

नारो आप्पाजी खिरे कोण होते?

‘नावामागे दडलंय काय?’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे –

श्रीमंत नारो आप्पाजी खिरे मूळचे सातारचे. त्यांचे बालपणीचे नाव नारायण होते. जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा सरदार खाजगीवाले यांच्याकडे सरकारच्या कोठीखान्यात कारकून म्हणून कामाला होते. त्यांचे कामाची चोख पद्धत, कर्तृत्व व हुशारी पाहून नानासाहेब पेशव्यांनी इ.स. १७५० मध्ये त्यांना सरसुभेदारी दिली. नारो आप्पाजी खिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार पेठ वसविली. त्या पेठेचे ते कमावीसदारही होते. निजामाच्या पुणे हल्ल्यावेळी त्यांनी केलेल्या बचावामुळे बरेच नुकसान टळले. त्यावेळेस थोरले माधवराव पेशवे यांनी त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या कर्तबगारीची साक्ष त्यांच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वपूर्व कामेच देतात त्यांनी तुळशीबाग संस्थान स्थापन केल्यानंतर या संस्थानाचा एवढा बोलबाला झाला की, नारो आप्पाजींच्या ‘खिरे’ आडनावाला ‘तुळशीबागवाले’ असे जोडले गेले. आणि तेच पुढे त्यांचे आडनाव झाले.