भारतात कोणतीही निवडणूक असली की त्यात मतदानाच्या वेळी हाताच्या बोटावर लावली जाणारी शाई आलीच. या शाईला इलेक्टोरल इंक (Electoral Ink), वोटर्स इंक (Voters Ink), पोल इंक (Poll Ink) अशी अनेक नावं आहेत. या शाईचं वेगळेपण म्हणजे एकदा का ही शाई बोटांवर लावली की पुन्हा ती निघत नाही. यामुळे एकाच व्यक्तीकडून वारंवार मतदान करणे किंवा इतर गैरप्रकार टाळण्यास मदत होते. मात्र, ही शाई एकदा बोटावर लावली की साबण असो की हँडवॉश कशाचाही उपयोग का होत नाही? ही शाई सहजासहजी निघत का नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचाच हा खास आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इलेक्टोरल इंक पाण्याच्या संपर्कात आली की तिचा रंग बदलतो. सुरुवातीला बोटाला लावताना जांभळ्या रंगाची ही शाई नंतर काळपट होते आणि बोटावर एक दाग सोडते. या शाईत सिल्व्हर नायट्रेट असतं. हे सिल्व्हर नायट्रेट त्वचेतील प्रथिनांसोबत (प्रोटिन्स) अभिक्रिया करून एक बाँड तयार करतं. त्यामुळे शाई प्रकाशाच्या किंवा पाण्याच्या संपर्कात येताच तिचा रंग बदलून दाग तयार होतो. हा दाग/निशाण साबण, हँडवॉश किंवा इतर कोणत्याही रासायनिक पदार्थाचा उपयोग केला तरी अनेक दिवस पुसला जात नाही.

हेही वाचा : “काँग्रेसच्या नेत्याने बिपिन रावत यांना रस्त्यावरील गुंड म्हटलं होतं, त्यामुळे…”, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

“जुन्या मृत पेशी जाऊन नव्या पेशींची निर्मिती झाल्याशिवाय शाईचा दाग जात नाही”

इलेक्टोरल शाईचा हा डाग शाई लावलेल्या जागी जुन्या मृत पेशी जाऊन नव्या पेशींची निर्मिती झाल्यानंतरच जातो. शाई लावल्यानंतर ही शाई ४० सेकंदात वाळते आणि दाग तयार होतो. या शाईची क्षमता त्या शाईतील सिल्व्हर नायट्रेटच्या प्रमाणावर ठरते. शाईतील सिल्व्हर नायट्रेटचं प्रमाण ७ टक्क्यांपासून २५ टक्क्यांपर्यंत असतं. मात्र, प्रॉपरायटीमुळे यांचं अचूक प्रमाण जाहीर करण्यात आलेलं नाही.

निळ्या शाईच्या गमतीशीर इतिहासाबद्दल

१९५१- ५२ साली आपल्या देशात पहिली निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी बोटाला निळ्या रंगाची शाई लावण्याचा नियम नव्हता. त्यामुळे अनेक मतदारांनी आपल्या आवडत्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी दोन वेळा मतदान केल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले. नियमाप्रमाणे एका उमेदवाराला एका मतदात्याने एकदाच मतदान करणे गरजेचे आहे. तरच या संपूर्ण निवडणूक प्रकल्पाला निष्पक्ष प्रक्रिया म्हणता येईल. परंतु पहिल्याच निवडणुकीत झालेल्या गोंधळामुळे अनेकांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली होती.

दरम्यान ‘मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड’ या कंपनीने एका रासायनिक पदार्थाचा शोध लावला होता. हा पदार्थ पाण्याने किंवा कुठल्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थाच्या मदतीने मिटवता येत नव्हता. निवडणूक आयोगाने या पदार्थाची संपूर्ण माहिती घेऊन याचा वापर निवडणूक प्रक्रियेसाठी करण्याचा निर्णय घेतला. या पदार्थाला ‘अमिट शाई’ असे नाव देण्यात आले. मतदान करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तिच्या बोटावर ही निळी शाई लावली जाते. ही शाई एकदा आपल्या बोटाला चिकटली की पुढील काही दिवस त्याला मिटवता येत नाही. त्यामुळे एखादा व्यक्ती जर दुसऱ्यांदा मतदान करण्यास आला तर त्याला पकडता येते. या शाईमुळे आपली निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ झाली.

अनेक संशोधकांनी या शाईत वापरण्यात येणाऱ्या पदार्थांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड’ या कंपनीने निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष होण्यासाठी ही शाई बनवण्याची प्रक्रिया गुप्त ठेवली आहे. आज जगातील तुर्कस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, घाना असे तब्बल २८ देश या अमिट शाईचा आपल्या निवडणुकीत वापर करतात.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know why the electoral ink applied on the finger while voting does not remove pbs