लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. अनेक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ उमेदवारांच्या रंगतदार लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशीच एक लढत धाराशिवमध्ये (उस्मानाबाद लोकसभा) होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटातील विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने अर्चना पाटील यांना धाराशिवमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, ओमराजे निंबाळकर हे गेल्या काही दिवसांपासून आमदार राणाजगजीतसिंह पाटलांवर वेगवेगळे आरोप करत आहेत तर राणा पाटील त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. धाराशिवमध्ये ही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच ओमराजे निंबाळकर यांनी नवी मुंबईतल्या तेरणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयावरून राणा पाटलांवर आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना राणा पाटील म्हणाले, ओमराजेंनी आरोप सिद्ध केले तर मी राजकारण सोडून देईन.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धाराशिवमधील प्रचारसभेत ओमराजे निंबाळकर म्हणाले होते, १९८३ साली सरकारने धाराशिवसाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं होतं. परंतु, त्यांनी (राणा जगजीतसिंह पाटील यांचे वडील पद्मसिंह पाटील यांनी) ते नवी मुंबईतल्या नेरुळ या ठिकाणी नेलं. नेरूळ हा काय आदिवासी भाग आहे का? धाराशिवचे लोक यांच्यासाठी मतदान करणार, दवाखान्याची आवश्यकता धाराशिवच्या लोकांना, धाराशिवमधील शेतकऱ्यांचा मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची आवश्यकता, पण यांनी (पाटील कुटुंब) ते नेरुळला नेलं. ही आपल्या मतदारसंघाची मोठी शोकांतिका आहे. यांनी ते वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नेरुळला नेलं ते नेलं वर त्यांनी ते स्वतःच्या संस्थेच्या मालकीचं केलं. यांनी स्वतःची एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट काढली आणि ते महाविद्यालय आता या ट्रस्टच्या मालकीचं आहे. मी राणा पाटलांना जाहीर आव्हान देतो की, त्यांनी १९८३-८४ नंतर २०२४ पर्यंत धाराशिवमधील एका तरी सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला त्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देऊन डॉक्टर केलं आहे का ते सांगावं. असा एक तरी डॉक्टर त्यांनी दाखवावा. मी ठामपणे सांगतो की, त्यांनी असा एकही डॉक्टर घडवलेला नाही.

हे ही वाचा >> “२०१४ च्या निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच…”, अजित पवारांचा नवा गौप्यस्फोट; म्हणाले “मी पहाटे पाच वाजता…”

खासदार ओमराजे निंबाळकरांच्या या आरोपांवर राणा जगजीतसिंह पाटील यांनी उत्तर दिलं आहे. पाटील म्हणाले, आमचा प्रतिस्पर्धी हा खोटारडा माणूस आहे. त्यांचं खोटं बोलणं, नाटकी बोलणं, बोलबच्चनगिरी करणं चालू असतं. परंतु, ती बोलबच्चनगिरी आता खपवून घेतली जाणार नाही. हा विरोधक खोटारडा आहे. तो म्हणे इथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं होतं ते आम्ही दुसरीकडे नेलं. असं झालं असेल तर त्यांनी पुरावा सादर करावा, मी राजकारण सोडून देतो. तो माणूस एक नंबरचा खोटारडा आहे. त्यापेक्षा जास्त काय बोलायचं? एकतर त्याला काही समजत नसेल किंवा तो खोटं बोलत असेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranajagjitsinha patil says if omraje nimbalkar allegations proved i will quit politics osmanabad lok sabha election asc