काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी मंगळवारी आभासी माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संवादात विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी बिनधास्तपणे उत्तरे दिली. हस्तिनापूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि चित्रपट अभिनेत्री अर्चना गौतम यांच्यावर टिप्पणी करणाऱ्यांनाही प्रियंका गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदींना किंवा दुसऱ्या पुरुषांना लग्नाबाबत का विचारले जात नाही. ते कधी आणि कोणासोबत लग्न करणार हेही त्यांना विचारायला हवे. असे प्रश्न फक्त महिलांनाच का विचारले जातात? पुरुषांना असे प्रश्न का विचारले जात नाहीत?, असे प्रत्युत्तर प्रियांका गांधी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिले.

माध्यमे आमच्या उमेदवाराला विचारत आहे की ती कधी लग्न करणार आहे. तुम्ही कोणते कपडे घालता? असे प्रश्न नरेंद्र मोदींना का विचारले जात नाहीत. ते कोणाशी लग्न करणार किंवा करणार नाही हे मोदींना का विचारले जात नाही. असे प्रश्न इतर पुरुषांना का विचारले जात नाहीत? असे प्रश्न फक्त महिलांनाच का विचारले जातात, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

“अर्चना गौतमने खूप संघर्ष करून आपले आयुष्य घडवले आहे. लोक तिला ओळखू शकतील अशा टप्प्यावर ती पोहोचली आहे. अर्चना गौतम महिलांची सेवा आणि हस्तिनापूरच्या विकासावर बोलत आहेत. सार्वजनिक समस्या मांडण्यावर तिने भर दिला आहे,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

त्याचवेळी हस्तिनापूरमधील काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री अर्चना गौतम म्हणाल्या की, माझ्या समर्थनात येऊन प्रियांका गांधींनी महिलाविरोधी आणि विकासविरोधी विचार करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

“मला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होण्याची भीती वाटत नाही. सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो, व्हिडिओ मी डिलीटही करणार नाही. मी स्पर्धा आणि चित्रपट क्षेत्रात होते आणि आता राजकारणात आहे. यावेळी क्षेत्र आणि काम दोन्ही भिन्न आहे,” असे अर्चना गौतम म्हणाल्या.

यावेळी प्रियंका गांधी यांनी सांगितले की, आजी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आम्ही भाऊ-बहीण १२ ते १८ वर्षांपर्यंत घरीच राहिलो. त्या काळात राहुल आणि मी एकटेच राहायचो. दरम्यान आमच्यातली मैत्री खूप घट्ट झाली होती. प्रियांका गांधी म्हणाल्या की, उत्तर प्रदेशमध्ये मॅरेथॉनच्या आयोजनात मुलींचा सहभाग खूप चांगला होता. मुलींनी यात उत्साहाने भाग घेतला याचा आम्हाला आनंद आहे. आता आम्ही ऑनलाइन स्पर्धेअंतर्गत मुलींसाठी चांगले काम करत राहू.

उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला तिकीट दिल्यावरुनही त्यांनी भाष्य केले. “तिच्या कुटुंबावर अत्याचार करण्यात आला. त्यांना त्यांची लढाई लढण्याचा अधिकार आहे. महिलांना तिकीट दिल्याबद्दल ते म्हणाले की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे याचा मला आनंद आहे,” असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up election 2022 ask modi when will he marry congress priyanka gandhi reply candidate archana gautam abn