हृषिकेश देशपांडे
पोटनिवडणुकीचा कौल सर्वसाधारणपणे सत्तारूढ पक्षाच्या बाजूने लागतो. मात्र गेल्या काही वर्षांत मतदारांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. जात,धर्माबरोबरच विकासाचा मुद्दा आणि उमेदवार कोण, यालाही महत्त्व आहे. नुकतीच लोकसभेच्या तीन, तर विधानसभांच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यातून फार मोठा जनमताचा कौल किंवा राजकीय दिशा स्पष्ट होणार नसली तरी, राजकीय पक्षांना आपली तयारी किती आहे, त्यातून काय धडा घ्यावा हे नक्कीच समजले. त्या अर्थाने याचे विश्लेषण गरजेचे आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

उत्तर प्रदेशात भाजपसमोर समाजवादी पक्ष निष्प्रभ!

उत्तर प्रदेशात आझमगड आणि रामपूर या दोन्ही लोकसभा मतदार संघांत समाजवादी पक्षाचा पराभव झाला. खरे तर लाखांच्या मतांनी येथून या पक्षाने पूर्वी मिळवला होता. त्यातही समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा आझमगड हा मतदारसंघ. अखिलेश प्रचारात विशेष सक्रिय नव्हते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आझमगडमधील १० पैकी एकही ठिकाणी भाजपला विजय मिळाला नव्हता. तरीही लोकसभेच्या पोटनिवडणुकीत चित्र वेगळे दिसले.  भाजपने भोजपुरी कलावंत दिनेश लाल यादव निरहुआ यांना उमेदवारी दिली होती. सपने प्रचारात त्यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. याखेरीज बहुजन समाज पक्षाने या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिला होता. त्यांच्या उमेदवाराला २ लाख ६६ हजार मते मिळाली. हे भाजपच्या पथ्यावर पडले, अर्थात मतविभाजनाचे खापर बसपवर फोडून सपला सबब सांगता येणार नाही. निवडणूक प्रचारात एकसंघ अशी संघटना उभी करण्यात त्यांना यश आले नाही. रामपूरमध्ये आझम खान यांच्या मतदारसंघात भाजपने सहज विजय मिळवला. येथे बहुजन समाज पक्षाचा उमेदवार नव्हता. त्यामुळे त्यांची मते काही प्रमाणात भाजपकडे वळाली हे स्पष्टच आहे. या निकालातून मुख्यमंत्री योगींचे नेतृत्व अधिक मजबूत झाले.

विश्लेषण : पंजाबमध्ये सिमरनजीत सिंग मान यांचा विजय का ठरू शकतो धोक्याची घंटा?

पंजाबमध्ये ‘आप’ला अपयश का?

पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांचा संगरुर लोकसभा मतदारसंघ आम आदमी पक्षाला गमवावा लागला. परिणामी लोकसभेत त्यांचा एकही सदस्य नसेल. येथून खलिस्तानवादी नेते व शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर सिमरजितसिंग मान गट) ७७ वर्षीय सिमरजितसिंग मान हे सहा हजार मतांनी विजयी झाले. निवृत्त आयपीएस अधिकारी असलेल्या मान यांच्यावर सातत्याने फुटीरतावाद्यांची पाठराखण केल्याचा आरोप आहे. या निकालाने राज्यात पुन्हा विभाजनवादी राजकारण उचल खाणार ही धास्ती आहे. पंजाबमध्ये सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच ‘आप’ला हा धक्का आहे. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व ९ विधानसभेच्या जागा ‘आप’ने मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना जागा राखता आली नाही. या मतदारसंघातील मुस्लिमबहुल मलेरकोटला विधानसभा मतदारसंघात मान यांना मिळालेली आठ हजार मतांची आघाडी निकालात निर्णायक ठरली.

राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांची सरशी

दिल्लीत आम आदमी पक्षाने आपली जागा राखली. येथे भाजपला आत्मचिंतन करावे लागणार आहे. तर त्रिपुरात भाजपसाठी चार पैकी तीन जागा जिंकणे हा दिलासा असला तरी आगरताळा येथील प्रतिष्ठेची जागा गमवावी लागली. येथे काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्रिपुरात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. २०१८मध्ये भाजपने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची २५ वर्षांची राजवट संपवली होती. बिप्लब देव यांच्याकडे राज्याची धुरा दिली होती. मात्र त्यांच्या जागी माणिक सहा यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. पोटनिवडणुकीचे निकाल पाहता भाजपचा हा बदल फायदेशीर ठरला आहे. तसेच विरोधी पक्षांना एकजूट दाखविता आली नाही, ते भाजपच्या पथ्यावर पडले. माकप तसेच तृणमूल काँग्रेसचा फारसा प्रभाव पडला नाही. झारखंडमधील रांचीची जागा काँग्रेसने सहज जिंकली. राज्यातील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस तसेच राष्ट्रीय जनता दल सरकारवर भाजपने भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. हे सरकार २०१९ मध्ये सत्तेत आले, त्यानंतर चार पोटनिवडणुका झाल्या. यात चारही वेळा भाजपचा पराभव झाला आहे. आदिवासी मते मिळवण्यात पक्षाला अपयश येत असल्याचे हे एक प्रमुख कारण आहे. आंध्र प्रदेशातील पोटनिवडणुकीत सत्ताधारी वाय. एस. आर. काँग्रेसने विक्रमी मताधिक्याने जिंकत राज्यावरील पकड मजबूत केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained ruling party won the by election but in punjab defeat print exp 0622 abn
First published on: 28-06-2022 at 15:49 IST