राज्यात २०२५ची सुरुवात वाघांच्या मृत्यूने झाली आणि पहिल्यांदाच जानेवारी संपायचा असताना एक-दोन नाही तर अवघ्या २२ दिवसांत ११ वाघ मृत्युमुखी पडले. त्यामुळे पुन्हा एकदा वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे गांभीर्य प्रश्नांमध्ये अडकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाघांच्या मृत्यूची कारणे काय ?

राज्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या ११ वाघांच्या मृत्युंपैकी दोन मृत्यूंमागे शिकारीचे कारण असल्याचे स्पष्ट झाले. यात यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील वाघांच्या मृत्यूचा समावेश आहे. एका प्रकरणात वाघाचे तीन तुकडे करण्यात आले. तर दुसऱ्या प्रकरणात वाघाची नखे आणि दात गायब होते. वाघिणीच्या पाच ते सहा महिन्यांच्या दोन बछड्यांचे मृतदेह आढळले. दोन मृत्यू हे झुंजीत जखमी झालेल्या वाघांचे होते. तर इतर मृत्यू देखील संशयास्पद आहेत. यातील वाघांच्या शिकारीचा मुद्दा गंभीर मानला जात आहे. एका वाघाच्या शिकारीत बहेलिया शिकाऱ्यांचा ‘पॅटर्न’ नाही, पण दुसऱ्या शिकारीत वाघ आणि नखे गायब असल्याने बहेलिया शिकाऱ्यांचा धोकाही व्यक्त केला जात आहे.

वाघांचे हे मृत्यू चिंताजनक का?

२०२३च्या तुलनेत २०२४ या वर्षात वाघांच्या मृत्यूची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली. मात्र, २०२५ ची सुरुवात वाघांच्या मृत्यूने झाली. अवघ्या २२ दिवसात ११ वाघांचा मृत्यू होणे हे चिंताजनक मानले जात आहेत. अभ्यासकांच्या मते, डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यात वाघांच्या मृत्यूच्या अनेक घटना समोर येतात. यावर्षी डिसेंबरमध्ये हे प्रमाण वाढले आहे. त्यातही दोन मृत्यू शिकारीमुळे तर दोन मृत्यू संशयास्पद असल्याचे आढळून आले. वाघांची शिकार करणे, त्यांचे तुकडे करणे, वाघांची नखे, दात गायब करणे यातून शिकाऱ्यांनी वनखात्याला इशारा दिला आहे. याकडे खाते गांभीर्याने पाहणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

वाघांना अजूनही शिकारीचा धोका?

या वर्षातील दोन घटना स्पष्टपणे शिकारीकडे बोट दाखवणाऱ्या आहेत. त्यामुळे वाघांना शिकारीचा धोका अजूनही टळलेला नाही, हे स्पष्ट आहे. २०१३-१४ साली महाराष्ट्रात वाघांच्या शिकारीच्या घटना मोठ्या संख्येने उघडकीस आल्या. मध्य प्रदेशातील बहेलिया शिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील मेळघाटसह ताडोबा, पेंच आदी ठिकाणी वाघांच्या शिकारी केल्या. सुमारे १५०हून अधिक शिकारी, आरोपी यात पकडण्यात आले. मात्र, अलीकडच्या दोन वर्षांपूर्वी बावरिया या वाघांच्या अवयवांचा व्यवसाय करणाऱ्या तस्करांनीही महाराष्ट्रात वाघांच्या शिकारी केल्या. तर स्थानिकांचा खात्यावर असलेला राग वाघांच्या शिकारीत परिवर्तित होत आहे. त्यामुळे वाघांना शिकारीचा धोका अजूनही कायम आहे.

तपास का आवश्यक?

वाघांचा नैसर्गिक मृत्यू हा परिसंस्थेचा एक अपरिहार्य भाग आहे. नैसर्गिक मृत्युंमध्ये अधिवासाची लढाई, वृद्धत्व याचा समावेश आहे. तरीही अधिवासाच्या लढाईतून मृत्यू होत असेल तर वाघांना त्यांचा अधिवास कमी पडतो आहे का, त्यांच्या मूळ अधिवासात त्यांचे खाद्य उपलब्ध नाही का याचा शोध वनखात्याने घेणे अपेक्षित आहे. मृत्यू नैसर्गिक असला तरीही त्यामागील कारणांचा शोध घेणे अपेक्षित आहे. नवीन वर्षातील वाघांच्या मृत्यूसत्रात शिकार आणि संशयास्पद मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तर बछड्यांचा मृत्यू उपासमारीने झालेला आहे. त्यामुळे शिकारीचा मुद्दा जेवढा गंभीर तेवढाच उपासमारीचा मुद्दादेखील गंभीर मानला जात आहे.

डिसेंबर, जानेवारीतच मृत्यू अधिक?

अलीकडच्या काही वर्षांचा वाघांच्या मृत्यूचा आलेख पाहिला तर अधिकांश मृत्यू हे डिसेंबर, जानेवारी या महिन्यांतच झाले आहेत. त्यातही नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत होणारी मृत्यू संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात जानेवारी २०२१ मध्ये तब्बल सहा वाघ मृत्युमुखी पडले. यात एक आणि दोन जानेवारीला वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांच्या मृत्यूची घटना समोर आली. जानेवारी २०२२ मध्येही चार वाघ मृत्युमुखी पडले. जानेवारी २०२३ मध्ये पाच वाघांचा मृत्यू, तर जानेवारी २०२४ मध्ये चार वाघ मृत्युमुखी पडले. यातील दोन वाघांचा मृत्यू एकाच दिवशी झाला.

वनखाते कमी पडत आहे का?

या वर्षातील बहुतेक मृत्यू हे व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्याच्या बाहेर झाले आहेत. वाघांची संख्याही आता बाहेर अधिक आहे. त्यामुळे खात्याच्या सीमारेषेत येणाऱ्या वाघांच्या संरक्षण व संवर्धनापुरते मर्यादित न राहता या सीमारेषेच्या बाहेरील वाघांचे व्यवस्थापन आवश्यक आहे. या व्यवस्थापनात त्रुटी दिसून येतात. जंगलालगतच्या गावातील लोकांशी असणारा संवाद तुटलेला आहे. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर संवादाची धुरा न सोपवता वरिष्ठांनीदेखील गावकऱ्यांशी संवाद ठेवणे अपेक्षित आहे. पण संवादाचा हा पूल तुटलेला आहे. त्यामुळे बऱ्याचदा गावकऱ्यांचे अपेक्षित सहकार्य खात्याला मिळत नाहीत. या वर्षातील घटना त्याचेच द्योतक आहेत.
rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra 11 tigers died in just 22 days seriousness of tiger conservation lost print exp css