पूर्वी शेती आणि मासेमारी याभोवतीच रायगडचे अर्थकारण सीमित होते. आता पर्यटन आणि उद्योग यांनी त्याची जागा घेतली. जिल्ह्यात आज सर्वाधिक रोजगार निर्मिती ही पर्यटन व्यवसायातून होत असून, जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देण्याचे काम पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून होऊ लागले आहे. पर्यटनामुळे जिल्ह्याच्या बदललेल्या अर्थकारणाचा थोडक्यात आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यटनाच्या दृष्टीने रायगडचे महत्त्व?

भौगोलिकदृष्ट्या रायगड हा मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई या महानगरांना जोडलेला आहे. पश्चिमेला २१० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्र किनारा, तर पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वत रांगा. हेच भौगोलिक स्थान लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली होती. बदलत्या काळात आता पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणारे सर्वच घटक जिल्ह्यात अस्तित्वात आहेत. पर्यटनस्थळांवर महानगरामधून पोहोचणे सहज शक्य असल्याने महानगरांमधील पर्यटकांची रायगडमधील पर्यटन केंद्रांना विशेष पसंती मिळत असते.

हे ही वाचा… विश्लेषण : शेतकरी निराश, ग्राहकही हताश… कांदा खरेदी-विक्रीत मग नक्की कोणाचा फायदा?

जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे कोणती?

अलिबाग तालुक्यात अलिबाग, मांडवा, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, आक्षी, नागांव, चौल आणि रेवदंडा ही समुद्रकिनाऱ्यावरील गावे पर्यटन स्थळे म्हणून नावारूपास आली आहेत. मुरुडमधील काशिद, नांदगाव आणि मुरुड श्रीवर्धनमधील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, भरडखोल, वेळास ही ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. याशिवाय रायगड किल्ला, माथेरान, एलिफंटा लेणी यांचे अप्रूप जगभरातील पर्यटकांना आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय दृष्ट्या वाढली आहे. पूर्वी उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंत पर्यटकांचा ओढा रायगड जिल्ह्यात असायचा पण आता वर्षा ऋतुतही रायगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. कर्जत, माणगाव, महाड, पोलादपूर आणि रोहा तालुके वर्षा सहलीसाठी प्रसिद्ध झाले आहेत. कर्जतमधील पेब किल्ला, इरशाळगड, माणिक गड, कोथळी गड, सोलनपाडा धरण, सागरगड, ताम्हाणी घाट, देवकुंड धबधबा, सिक्रेट पाइंट, कुंभे धबधबा आणि परिसर, कोथेरी धबधबा, रायगड किल्ला, मोरझात धबधबा आणि कुडपण ही प्रमुख वर्षा पर्यटनस्थळे बनली आहेत.

दळणवळणाच्या सुविधांचा विकास कसा झाला?

गेल्या काही वर्षात रायगड जिल्ह्यात दळणवळणांच्या साधनात सुधारणा झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. अटल सेतूमुळे मुंबई रायगड जिल्ह्याला थेट जोडली गेली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील अंतर कमी झाले आहे. इंदापूर आगरदांडा, दिघी ते माणगाव, वाकण ते खोपोली, पेण ते खोपोली या महामार्गांचा रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण झाले आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा ताम्हणी मार्गही चांगल्या प्रकारे विकसित झाला आहे. या शिवाय अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिकेचे काम सुरू झाले आहे. मुंबई ते मांडवादरम्यान जलवाहतुकीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. जलप्रवासी सेवेबरोबर रोल ऑन रोल ऑफ सेवाही कार्यान्वित झाल्याने, मुंबईतील पर्यटकांना अलिबाग परिसरात अवघ्या एक तासात पोहोचणे शक्य झाले आहे.

हे ही वाचा… जगातील सर्वांत मोठ्या विमानतळासाठी ‘हा’ देश समुद्रामध्ये तयार करणार कृत्रिम बेट; याची वैशिष्ट्ये काय?

पर्यटन विकासासाठी किती रुपयांचा आराखडा?

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने २४३ कोटींचा जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केला होता. हा आराखडा तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या पॅनलवरील कन्सल्टिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या आराखड्यापैकी २४१ कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने यासाठी व्यापक निधी उपलब्ध करून दिला असून प्रस्तावित कामांना पावसाळ्यानंतर सुरवात होणार आहे. या आराखड्यानुसार अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळांसाठी १३७ कोटी ०७ लाख ५५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यात अलिबाग बीच, कुलाबा किल्ला परिसर विकासासाठी ३४ कोटी २५ लाख, मुरुड जंजिरा बीच आणि जंजिरा किल्ला परिसर विकासासाठी २९ कोटी २८ लाख, काशिद, नागाव, वरसोली, रेवंदाडा समुद्र किनाऱ्यांच्या पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

आव्हाने कोणती?

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये रायगड जिल्ह्यात तब्बल १९ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. यातून सुमारे साडेपाचशे कोटींची उलाढाल झाली होती. पन्नास हजारहून अधिक लोकांना यातून रोजगार संधी उपलब्ध झाली. यावरून पर्यटन क्षेत्राच्या वाढत्या पसाऱ्याचा अंदाज येऊ शकतो. पर्यटन व्यवसाय हा सर्वाधिक रोजगार संधी असलेले क्षेत्र आहे. एका व्यवसायातून किमान चार ते पाच जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकत आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाशी निगडित उद्योग जिल्ह्यात येणे अपेक्षित आहे, जिल्ह्यात पर्यटन क्षेत्राचा पसारा वाढत असला तरी तो विस्कळीत स्वरूपाचा आहे. त्यात सुसूत्रता नाही. असंघटित पद्धतीने हा व्यवसाय वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचा समूह विकास करणे, येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त दिवस थांबता येईल अशी पर्यटन केंद्रे विकसित करणे आवश्यक आहे.

harshad.kashalkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad district alibaug has become a favorite tourist destination more income from tourism than agriculture fishing print exp asj