Iran-Israel war has not hit Indian markets : इस्रायल व इराण या दोन देशांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. इस्रायलकडून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्याला इराणकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. गेल्या आठवड्यात इस्रायलने तेहरानमधील आण्विक तळांवर हल्ला केला होता, त्यानंतर इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्र डागले होते. मध्य-पूर्वे आशियात सुरू असलेल्या या संघर्षामुळे कच्च्या तेलाचे साठे धोक्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने जगभरातील अनेक देश चिंता व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे, भारतावर मात्र या संघर्षाचा कोणताही परिणाम होत नसल्याचं दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारात थोडीफार घबराट निर्माण झाली असली, तरीही गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात उलाढाल सुरू ठेवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत भडकल्या असतानाही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, काय आहेत यामागची कारणं? ते जाणून घेऊ…
इराणबरोबर सुरू असलेल्या संघर्षाच्या पाचव्या दिवशी इस्रायलने एक मोठा दावा केला आहे. इराणच्या युद्धकालीन प्रमुख सैन्य अधिकाऱ्याला आम्ही ठार केले असून, त्यामुळे तेहरानला युद्धात मोठे नुकसान सहन करावे लागतंय, असं इस्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे. इतकंच नाही तर इराणचे सर्वोच्च नेते अली हुसेनी खोमेनी यांच्याही खात्मा केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील नागरिकांना तत्काळ देशाची राजधानी तेहरान रिकामी करण्याचा सल्ला दिला आहे. इराणबरोबर युद्धविरामाची कोणतीही चर्चा झालेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
इस्रायल-इराण संघर्षाचा भारतावर काय परिणाम?
इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षाचा थेट परिणाम जगभरातल्या देशांवर होताना दिसून येत आहे. या युद्धामुळे अनेक देशांचे शेअर्स बाजार गडगडले असून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. दुसरीकडे, भारतासह काही देशांमधील शेअर बाजारावर या युद्धाचा कोणताही परिणाम होताना दिसून आलेला नाही. भारतातील गुंतवणुकदारांमध्ये घबराटीचं वातावरण असलं तरीही काही प्रमाणात का होईना ते शेअर्स बाजारात गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. १२ जून रोजी म्हणजेच इस्रायलने तेहरानवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याच्या आदल्या दिवशी, मुंबईतील शेअर बाजारातील सेंसेक्स ८१,६९१.९८ वर बंद झाला होता. युद्ध सुरू झाल्यानंतर तीन व्यापार सत्रांमध्ये हा निर्देशांक जवळपास स्थिर राहिला. मंगळवारी तो ८१,५८३ वर बंद झाला, म्हणजेच शेअर्स बाजारात केवळ १०८ अंकांची (०.१३%) किंचित घसरण झाली.
आणखी वाचा : Strait of Hormuz : होर्मुझ सामुद्रधुनी खरंच बंद होणार? इराणच्या धमकीमुळे जग का घाबरलंय? काय आहेत कारणे?
कच्च्या तेलाच्या किंमतीत झपाट्याने वाढ
अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनाच्या (EIA) माहितीनुसार, २०२३ च्या अखेरीस इराणकडे जगातील एकूण तेल साठ्यांपैकी १२ टक्के साठा होता. व्हेनेझुएला आणि सौदी अरेबियानंतर इराण कच्च्या तेलाच्या साठ्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय नैसर्गिक वायूच्या साठ्यातही रशियानंतर इराण दुसऱ्या क्रमांकावर येतो. इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षानंतर कच्च्या तेलाच्या दरात सुमारे ११ टक्के वाढ झाली आहे. १२ जून रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरेल ६७.३४ डॉलर्स इतके होते, दुसऱ्याच दिवशी ते वाढून ७४.६ डॉलर्सपर्यंत गेले. ही वाढ लक्षणीय असून, दोन्ही देशांमधील संघर्ष असाच सुरू राहिल्यास काही दिवसांत कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्सच्या पुढे जातील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थेने वर्तविला आहे.
इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात महागाई वाढणार?
- इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे जगभरातील देश चिंताग्रस्त आहेत.
- भारताला मात्र चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे.
- भारताची आर्थिक स्थिती सध्या स्थिर असून महागाई नियंत्रणात आहे. तसेच इराणबरोबर भारताचे फारसे व्यापार संबंध नाहीत. त्यामुळे या युद्धाचा परिणाम भारतावर थेटपणे होत नसल्याचं अर्थतज्ज्ञांनी सांगितलं आहे.
- भारतातील महागाई अजूनही नियंत्रणात आहे. मे २०२५ मध्ये भारतातील किरकोळ महागाई १४ महिन्यांतील नीचांकी गाठून ०.३९ टक्क्यांवर आली आहे.
- विशेष बाब म्हणजे, एप्रिलमध्ये महागाईचा दर ०.८५ टक्के होता. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महागाई दर ३.७ टक्के राहील असा अंदाज रिझर्व बँकेने व्यक्त केला आहे.
भारतातील अर्थतज्ज्ञ काय सांगतात?
‘ICICI’ सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख पंकज पांडे सांगतात, “सध्या ओपेककडे (OPEC) अतिरिक्त उत्पादन क्षमता उपलब्ध आहे आणि इस्रायलने इराणच्या तेल प्रकल्पांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे पुरवठ्यावर फारसा परिणाम झालेला नाही. महागाई नियंत्रणात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडाफार दिलासा मिळत आहे.” बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस सांगतात की, “इराणचा जागतिक पुरवठ्यात फक्त ४ टक्क्यांचा वाटा आहे आणि तो मुख्यतः चीनला जातो. सध्या दरवाढ ही पुरवठ्यावरील संकटामुळे नाही, तर मानसिक घबराटीमुळे आहे. युद्ध फार काळ चालेल असे वाटत नाही, कारण इराणकडे तशी ताकद नाही.” ते पुढे म्हणाले, “सध्या इराणचा जागतिक पुरवठ्यावर फारसा प्रभाव नसल्यामुळे प्रत्यक्ष पुरवठा खंडित होणार नाही. जर परिस्थिती आणखीच बिकट झाली तर दोन्ही देशांतील संघर्ष मिटविण्यासाठी इतर देश हस्तक्षेप करतील.”
हेही वाचा : पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची अमेरिका दौऱ्यात नाचक्की; असीम मुनीर यांना कोण करतंय लक्ष्य?
२०२५ मध्ये भारतात किरकोळ महागाई
दरम्यान, इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष हा रशिया-युक्रेन युद्धासारखा फार काळ टिकणार नाही, असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. इराणकडे दीर्घकालीन युद्ध करण्याची क्षमता नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. हीच गोष्टही आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतासाठी दिलासा देणारी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारत सरकारकडे असलेला आर्थिक ‘बफर’ पाहता, जागतिक कच्च्या तेलाच्या दरवाढीचा किरकोळ ग्राहकांवर आणि ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) तातडीने फारसा परिणाम होणार नाही. भारतातील महागाई अजूनही नियंत्रणात आहे. मे २०२५ मध्ये भारतातील किरकोळ महागाई १४ महिन्यांतील नीचांकी गाठून ०.३९ टक्क्यांवर आली आहे. विशेष बाब म्हणजे, एप्रिलमध्ये महागाईचा दर ०.८५ टक्के होता. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महागाई दर ३.७ टक्के राहील असा अंदाज रिझर्व बँकेने व्यक्त केला आहे.
तेल दरवाढीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?
भारत सुमारे ८५ टक्के कच्चे तेल परदेशातून आयात करतो. एकूण आयातीच्या २५ टक्क्यांहून अधिक भाग तेलावर अवलंबून आहे. तेलाचे दर वाढल्यास चालू खात्यातील तूट वाढते, कारण आयातीवरील खर्चही वाढतो. त्यातच गँस आणि केरोसीनवरील अनुदान वाढविण्यात आल्यामुळे सरकारवर सबसिडीचा अतिरिक्त बोजा पडतो. घाऊक किंमत निर्देशांकात कच्च्या तेलाचे योगदान ९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तेलाचे दर १० टक्क्यांनी वाढले तर किरकोळ महागाईत ०.९% वाढ होऊ शकते. इराण-इस्रायल यांच्यातील तणावामुळे जगभरातील अनेक देशांचा ताण वाढला असला तरी, सध्या भारताची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. त्यातच इराणबरोबर थेट व्यापाराचा फारसा संबंध नसल्यामुळे आणि जागतिक पुरवठ्यातील त्यांचा वाटा मर्यादित असल्यामुळे चिंतेचे कोणतेही कारण नाही, असं अर्थतज्ज्ञांनी सांगितलं आहे.