वाहतूक समस्येसंदर्भात अभ्यास करणाऱ्या ‘टॉम-टॉम’ या जागतिक संस्थेच्या अभ्यासात सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांमध्ये पुणे जगात चौथ्या स्थानी असल्याचे समोर आले आहे. का होतो आहे हा प्रश्न जटिल?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टॉम-टॉमसंस्थेच्या कामाचे स्वरूप काय?

‘टॉम-टॉम’ ही जगभरातल्या महानगरांमधील वाहतूक आणि रहदारीच्या समस्यांचा अभ्यास करणारी संस्था आहे. दक्षिण आणि उत्तर अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि आशिया या सहा खंडांतील ६२ देशांतील ५०० हून अधिक महानगरांमधील वाहतूक, रहदारी, प्रवाशांना लागणार वेळ, गर्दीची पातळी यानुसार मूल्यांकन करून चालक, पादचारी, शहर नियोजन, विकासात्मक धोरण आदींबाबत ही संस्था माहिती पुरवते. प्रत्येक शहरात कोणत्या वेळेला सर्वाधिक वाहने रस्त्यावर असतात, त्यांना कोणत्या अडचणी येतात, ठरावीक अंतरावर पायी आणि वाहनाने जाण्यासाठीचा कालावधी आदी बाबींचे अभ्यासपूर्ण मूल्यमापन करते. त्यानुसार, कोणत्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे, याबाबत सल्ला-सेवा दिली जाते.

हेही वाचा >>> हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?

२०२४ च्या अहवालाचे निष्कर्ष काय?

२०२४ च्या अहवालानुसार, संथ वाहतूक असलेल्या शहरांत जगात पहिल्या क्रमांकावर कोलंबियातील बरानकिला हे शहर असून, या ठिकाणी सर्वाधिक वाहतूक कोंडी असल्याचे समोर आले आहे. त्यापाठोपाठ भारतातील कोलकाता दुसऱ्या, तर बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर पुणे आहे. पुण्यातील वाहनचालकांना दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ३३ मिनिटे २२ सेकंदांचा कालावधी लागत असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. विशेष म्हणजे वाहतूक कोंडीत मुंबई ३९ व्या स्थानी असून दिल्ली १२२ व्या स्थानी आहे. गेल्या वर्षभरातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे, पायाभूत सुविधांचा अभाव आदी प्रमुख कारणे या शहरांमधील वाहतुकीचा वेग मंदावण्यास कारणीभूत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी पर्यावरणाला हानीकारक कशी?

खासगी वाहनांचा वाढता वापर, त्यात वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर जाळले जाणारे इंधन, वाहनाच्या कार्यक्षमतेत घट अशा विविध कारणांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइड हे अवजड वाहनांद्वारे तयार होणारे प्राथमिक वायू प्रदूषक आहेत, तर कार्बन डायऑक्साइड हा एक हरितगृह वायूही असून, तो पृथ्वीचा पृष्ठभाग गरम करतो. एक अवजड वाहन वर्षभरात अंदाजे ३३ कोटी ३० लाख टन कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडत असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. वाहनांमधून निघणारा धूर हवेत मिसळून शरीरात गेल्यास दमा, श्वसनाचे आजार बळावत आहेत. श्वास घेण्यात अडचणी आल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजार उद्भवत आहेत. कोंडीत रस्त्यावर जाणारा वेळ स्थूलपणा आणि मधुमेहाचे विकार होण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निष्कर्षही काही संस्थांच्या अभ्यासातून मांडण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> Saif Ali Khan Attack : सैफ अली खानची दरोडेखोराबरोबर झटापट कशी झाली? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

नोकरी, व्यापार, उद्याोगधंद्यांवर परिणाम काय?

पुणे, मुंबई, हैदराबाद आदी शहरांमध्ये वाहतूक कोंडी ही बाब नित्याचीच झाली आहे. वाहनचालक गर्दीतून प्रवास करत नियमित ठिकाण गाठण्यासाठी धरपड करत असतात. अशा वेळी वाहतुकीच्या बाबतीत अचानक उद्भवणाऱ्या समस्या, अपघात, मार्गबदल यामुळे कर्मचारी नोकरीच्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकत नाहीत. वाहतूक कोंडीचा सामना दररोजच करावा लागत असल्याने कामावर परिणाम होत आहे. उद्याोगधंद्यांच्या दृष्टीनेही वाहतूक समस्या तितकीच जटिल ठरली असून माहिती तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रांतील कंपन्यांनी वाहतूक कोंडीमुळे काही शहरांतून स्थलांतर केले आहे.

या अहवालावर तज्ज्ञांचे म्हणणे काय?

‘पुण्यासह राज्यात वाहतुकीच्या दृष्टीने मोठमोठे प्रकल्प हाती घेऊन महानगरांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्यातून वाहतूक कोंडी आणखी उग्र रूप धारण करत आहे. सद्या:स्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत आणि सुरक्षित करणे एवढाच यावरील एकमेव मार्ग आहे. सार्वजनिक वाहतूक सुरक्षित, टिकाऊ, पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. खासगी वाहनांकडे वळण्यासाठी प्रशासनच कारणीभूत असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे महत्त्वाचे आहे. त्याबाबत जनजागृती करून सुलभ सुविधा उपलब्ध करून दिल्यास, तसेच दळणवळणाची परवडणारी, आरामदायी आणि भरवशाची सेवा दिल्यास खासगी वाहनांची संख्या निश्चितच घटेल,’ असे ‘परिसर’ संस्थेचे संचालक रणजीत गाडगीळ यांनी सांगितले.

vinay.puranik@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report print exp zws