कोल्हापूर : संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार सर्व कामे १० जून पूर्वी पूर्ण करावीत. मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
मान्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. रेखावार म्हणाले, पुर परिस्थितीमुळे जीवित अथवा वित्त हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.पूरप्रवण गावांमधील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुस्थितीतील बसेस, रुग्णवाहिका तैनात ठेवा,असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>कोल्हापुरातील पंचगंगा, भोगावती नदीत पुन्हा पाणी उपसाबंदी; शेतकरी संतापले
रजेला रजा
जनावरांच्या चारा छावण्या उभारण्यासाठीची कार्यवाही वेळेत करा. पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास बि-बियाणे, खतांचा पुरेसा साठा तयार ठेवा, अशा सूचना त्यांनी केल्या. १५ जून नंतर अधिकारी- कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करु नयेत.
हेही वाचा >>>सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणाचा कागल तालुक्यात खून
इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त प्रभाकर देशमुख, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी त्यांच्या विभागाच्या तयारीची माहिती दिली.
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.