कोल्हापूर : तीन दिवसांच्या अंतरानंतर कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात पावसाची गती वाढण्याची चिन्हे आहेत. यामुळे राजाराम बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाणी पातळी वाढण्याच्या भितीने राधानगरी धरण, तसेच पंचगंगा, भोगावती, कुंभी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली होती. आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुपारी एक वाजता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. रेड अलर्ट देण्यात आला होता. परंतु, बारा वाजल्यापासूनच जोरदार पाऊस पडू लागला. तो रात्रीपर्यंत अधून मधून कायमच होता. शहरातील राजाराम बंधाऱ्यावर आठवड्यात पाणी दुसऱ्यांदा आल्याने या महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

राधानगरी धरणाचा विसर्ग एक हजार क्युसेसने वाढवून २५०० क्युसेस करण्यात आल्याने भोगावती, पंचगंगा नदीकाठच्या तसेच कुंभी मध्यम प्रकल्पाच्या विद्युतगृहामधून ३०० क्युसेस विसर्ग कुंभी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.