बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि कंपूविरोधात घेतलेला पवित्रा मुंबई क्रिकेट असोसिएशन तसेच विदर्भ आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनला महागात पडण्याची चिन्हे आहेत. स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मुदगल समितीने श्रीनिवासन यांना ‘क्लीन चिट’ दिल्याने पुन्हा एकदा बीसीसीआयच्या कारभारात श्रीनिवासन यांचा वारू भरधाव होणार आहे. याचा पहिला फटका श्रीनिवासन यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या संलग्न संघटनांना बसणार आहे. असे झाल्यास नियमित कसोटी आयोजित करणाऱ्या मुंबई, नागपूर आणि मोहाली या केंद्रांना आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनाचे अधिकार मिळणार का? याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या चेन्नईत झालेल्या बैठकीत मुंबई क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि पंजाब क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून आर्थिक रक्कम वसूल करावी, अशी चर्चा झाल्याचे बैठकीला उपस्थित सूत्रांनी सांगितले.
श्रीनिवासन यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या बीसीसीआयतर्फे निलंबित करण्यात आलेल्या बिहार क्रिकेट असोसिएशनच्या आदित्य वर्मा यांच्यावर या तीन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी भूमिका श्रीनिवासन समर्थक गटाने घेतली आहे.
एमसीएचे अध्यक्ष शरद पवार, व्हीसीएचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीएचे अध्यक्ष आयइएस बिंद्रा हे तिघेही श्रीनिवासन यांचे कट्टर विरोधक आहेत. सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या कसोटीनंतर मुंबईत कसोटी सामना झालेला नाही. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईत होणार होता. मात्र आयत्या वेळी हा सामना बंगळुरू येथे हलवण्यात आला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action will be taken against vidarbha and punjab cricket association