Babar is not even worthy of Virat Kohli’s shoes : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मधील १९वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघात होणार आहे. हा सामना आज न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि बाबर आझमच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. कारण विराट-बाबर यांच्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण यावर अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. आता टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने विराट आणि बाबरमध्ये कोण सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, याबद्दल सांगताना बाबर आझमबद्दल एक मोठे वक्तव्य केले, जे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
दानिश कनेरियाने काढली बाबर आझमची लायकी –
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आयएएनएसशी बोलताना दानिश कनेरिया म्हणाला, “बाबर आझमने शतक झळकावताच दुसऱ्या दिवशी त्याची विराट कोहलीशी तुलना सुरू होते. खरं तर त्याची विराट कोहलीच्या पायताणा एवढी पण लायकी नाही. कारण बाबर आझमने अमेरिकेच्या गोलंदाजांपुढेही गुडघे टेकले. तो अमेरिकन गोलंदाजांचा सामना करताना पण अपयशी ठरला. बाबर आझम अमेरिकेविरुद्ध ४४ धावांवर बाद झाला. यानंतर पाकिस्तानला ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. खरं तर हा सामना पाकिस्तानने एकतर्फी जिंकायला हवा होता, पण त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.”
पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे वक्तव्य –
या स्पर्धेची सुरुवात पाकिस्तानच्या धक्कादायक पराभवाने झाली. रोमहर्षक सामन्यात त्यांना अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला. सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. पाकिस्तानने खेळाच्या सर्व पैलूंमध्ये खराब कामगिरी केली, त्यांच्या एका अनुभवी गोलंदाजाने म्हणजेच मोहम्मद अमीरने सुपर ओव्हरमध्ये १८ धावा दिल्या, ज्यामध्ये ७ अतिरिक्त धावा होत्या. कनेरियाने भारत-पाकिस्तान सामन्यावर भाकित केले आणि म्हणाला, ‘भारत पाकिस्तानला वाईट पद्धतीने पराभूत करेल. कारण भारताला पराभूत करण्यासाठी सक्षम नाहीत.’
हेही वाचा – IND vs PAK: रोहित शर्माचे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर…
भारत-पाक सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून –
दानिश कनेरिया पुढे म्हणाला, “जेव्हाही पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये येतो, तेव्हा त्यांच्या गोलंदाजीची प्रशंसा करतो. त्याच्या गोलंदाजीमुळे ते सामना जिंकणार होते, पण त्याच्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानला पहिला सामना गमवावा लागला.” टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दहशतवादाचा धोका लक्षात घेता या महामुकाबल्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. त्याच वेळी, न्यूयॉर्कच्या ड्रॉप-इन खेळपट्ट्यांबाबत सस्पेंस आहे. अशा स्थितीत या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून संपूर्ण जगाचे लक्ष या हाय-व्होल्टेज सामन्यावर लागून आहे.
© IE Online Media Services (P) Ltd