नवी दिल्ली : विश्वचषक जिंकणे ही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जिंकण्यापेक्षा मोठी उपलब्धी आहे. भारताला या वेळी चांगली संधी आहे. यासाठी संघ व्यवस्थापनाने रोहित आणि हार्दिकला एकत्र आणणे महत्त्वाचे ठरेल, असे मत भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘हार्दिकला मी पूर्वीपासून ओळखत आहे. गेले दोन महिने वैयक्तिक आयुष्याबरोबरच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी न स्वीकारल्यामुळे हार्दिक मुक्तपणे खेळू शकत नव्हता. कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून मुंबई इंडियन्स संघ एकत्रित खेळताना दिसला नाही. म्हणूनच विश्वचषक स्पर्धेत संघ व्यवस्थापनाने सर्व संघाला एकत्रित बांधण्याचे त्यातही रोहित-हार्दिकला एकत्र आणणे खूप आवश्यक आहे,’’असे हरभजनने सांगितले.

विश्वचषकासाठी निवडलेल्या संघाबाबत बोलताना हरभजनने वेगवान गोलंदाजीच्या आघाडीवर बुमराला सहकाऱ्यांकडून चांगली साथ मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. हरभजन म्हणाला, ‘‘वेगवान गोलंदाजी ही निश्चित चिंतेची बाब आहे. बुमरा वेगळ्याच धाटणीचा गोलंदाज आहे. तो कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर सामना जिंकून देऊ शकतो. अन्य गोलंदाजांसारखी त्याला परिस्थितीची गरज नसते. त्यामुळे बुमरावर मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी बुमराला सहकाऱ्यांकडून पूरक साथ मिळणे अपेक्षित आहे.’’

हेही वाचा >>> VIDEO : “डोक्यावर नका बसू”, बाबर आझम चाहत्यांवर संतापला, अन काही वेळाने…

सध्या चर्चेत असलेल्या विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत बोलताना हरभजन म्हणाला,‘‘विराट खूप बदलला आहे. ‘आयपीएल’मध्ये विराटने स्वत: मधील बदल दाखवून दिला आहे. गेल्या वर्षी तो १३०च्या स्ट्राइक रेटने खेळला, या वेळी त्याने १६०चा स्ट्राइक रेट राखला. हा खूप मोठा बदल आहे. रोहित आणि विराट यांना सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगाने धावा कराव्या लागतील. अर्थात, अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यांशी जुळवून घेणे आणि त्याचा आदर करणे तेवढेच गरजेचे आहे.’’

‘‘भारतीय संघाचे प्राशिक्षकपद ही पूर्णवेळ जबाबदारी आहे आणि तेवढा वेळ मी देऊ शकणार नाही. आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे आणि त्यांची काळजी घेणे याला माझे प्राधान्य राहील. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वत:हून मी प्रशिक्षकपदासाठी तयार असल्याचे सांगेन,’’असे हरभजनने सांगितले.

कोणीही प्रशिक्षकपदी यावे, मात्र काम चांगले करावे

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी हा एक काटेरी मुकुट असतो. गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार ही सध्या फक्त चर्चा आहे. खेळाडूंना एकत्र ठेवणे हे प्रशिक्षकाचे मोठे काम असते. त्यामुळे संघाची एकत्रित कामगिरी चांगली होत असते. गौतम काय किंवा आशीष नेहरा कुणालाही प्रशिक्षक बनण्याची संधी मिळो, त्यांनी पूर्वीच्या प्रशिक्षकाने केलेल्या कामापेक्षा अधिक चांगले काम करून दाखवावे इतकीच अपेक्षा आहे, असे हरभजन म्हणाला.

विश्वचषकासारखी स्पर्धा जिंकायची असेल, तर एकत्रितपणे खेळणे सर्वात महत्त्वाचे आहे. संघ एकत्रित ठेवण्याची जबाबदारी संघ व्यवस्थापनाची आहे. पराभव झाला, तरी त्याची जबाबदारी एकत्रित असायला हवी. – हरभजन सिंग, भारताचा माजी गोलंदाज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bring rohit sharma hardik pandya together says harbhajan singh to bcci ahead of t20 world cup zws