ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताचा २१ धावांनी पराभव झाला. या पराभवासह टीम इंडियाने वनडे मालिकाही २-१ ने गमावली. पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतप्त दिसत होता. पोस्ट मॅच शोमध्ये त्याने फलंदाजांना धारेवर धरत चांगलेच फटकारले. त्याने पराभवाचे खापर फलंदाजांच्या अनाकलनीय फलंदाजीवर फोडले. टीम इंडियाच्या पराभवामुळे यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच त्याच सामन्यादरम्यान अचानक एका पक्षाने मैदानात खेळाडूंवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी ४९ षटकात सर्वबाद २६९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. भारताने २०० धावांचा टप्पा पार केल्यानंतर सामना काही वेळासाठी अचानक थांबवला गेला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मैदानात घारींचा हल्ला झाला.

नेमके झाले असे की, भारतीय डावाच्या ४१व्या षटकानंतर ६ विकेट्स गमावत २०९ धावा झाल्या होत्या. त्यानंतर ऑसीकडून ४२वे षटक टाकण्यासाठी मार्कस स्टॉयनिस आला होता. त्यावेळी स्ट्राईकवर हार्दिक पांड्या होता आणि दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजा उभा होता. यावेळी षटकातील ४ चेंडू टाकून झाले होते. मात्र, अचानक सामना थांबवण्यात आला कारण घारींनी मैदानात एन्ट्री केली. यामुळे पांड्यासह स्टॉयनिसलाही पुरता घाम फुटला होता. तसं बघायला तर ती घार मैदानात पडलेल्या एका किड्याला उचलण्यासाठी आली होती तिने त्या किड्याला तोंडात धरले आणि ती निघून गेली. काही वेळानंतर सामना पुन्हा सुरू झाला पण घारींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

सामन्यानंतर रोहित म्हणाला, मला वाटत नाही की २६९ धावा जास्त धावा होत्या. दुसऱ्या सत्रात विकेट जरा जास्तच आव्हानात्मक झाली. आम्ही खराब फलंदाजी केली. या विकेट्सवर खेळून आम्ही मोठे झालो, तरीही फलंदाज असे कसे बाद झाले कळत नाही. फलंदाजांनी लहानपणापासून शिकलेल्या गोष्टी लागू करणे आवश्यक होते. चांगल्या सुरुवातीनंतर फलंदाजाने शेवटपर्यंत खेळ घेऊन जाणे महत्त्वाचे होते, पण तसे झाले नाही. जानेवारीपासून आम्ही नऊ एकदिवसीय सामने खेळलो आहोत, पण त्यात अनेक सकारात्मक गोष्टी आहेत. आपल्याला कुठे सुधारणा करायची आहे हे समजून घेतले पाहिजे. हे सामूहिक अपयश आहे आणि या मालिकेतून आपल्याला खूप काही शिकता येईल. या विजयाचे श्रेय ऑस्ट्रेलियन संघाला द्यायला हवे. त्यांच्या फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांनीही कसून गोलंदाजी करून दबाव निर्माण केला. म्हणूनच आमचा पराभव झाला.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus while during the match kite suddenly attacked on pandya and stoinis and they were also scared video viral avw