Hardik Pandya revealed the discussion during the strategic timeout: लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि गुजरात टायटन्स (जीटी) यांच्यात शनिवारी लखनऊमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास गुजरातने हिसकावून घेतला. गुजरातने लखनऊवर ७ धावांनी शानदार विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने १३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ केवळ ७ बाद १२८ धावाच करू शकला. सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने विजयावर प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लक्ष्याचा पाठलाग करताना एलएसजी संघ भक्कम स्थितीत होता आणि केएल राहुलने अर्धशतक झळकावले होते, पण शेवटच्या दोन षटकांनी सामना फिरवला. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी अखेरच्या षटकात शानदार गोलंदाजी केली. अखेरच्या षटकात लखनऊच्या केएल राहुलसह ४ विकेट पडल्या. त्यामुळे गुजरात टायटन्सने अखेरीस एलएसजीच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला.

विकेटमुळे फलंदाजांना लय सापडली नाही –

विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, “श्रेय संघातील खेळाडूंना जाते. आम्ही चॅम्पियन संघ आहोत, आम्ही गेल्या वर्षी जिंकलो. विकेट मिळाल्यानंतर, मूड आणि वातावरण बदलले आणि खूप छान भावना आहे. अशा विजयांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. मला वाटते की ज्या प्रकारची विकेट होती, आम्ही आणखी १० धावा करू शकलो असतो, परंतु त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला टिकणे कठीण केले. विकेटमुळे फलंदाजांना लय सापडली नाही.”

हेही वाचा – Video: मोहित शर्माच्या भेदक गोलंदाजीचा जलवा, गुजरातला पराभवाच्या छायेतून बाहेर काढलं, शेवटच्या षटकात केली कमाल

४ षटकात २७ धावा हव्या असताना तो दडपणाखाली दिसत होते –

हार्दिक पांड्याने स्ट्रेटेजिक टाइमआउट दरम्यान संघाच्या चर्चेबद्दलही खुलासा केला. तो म्हणाला, “आम्ही सेट बॅटरच्या शेवटपर्यंत खेळण्याबद्दल चर्चा केली. आम्ही खेळात कुठेही नव्हतो, फक्त त्यांचा पाठलाग करत होतो. जेव्हा त्यांना ३० चेंडूत ३० धावांची गरज होती, तेव्हा मला वाटले की ते पुढे आहेत. पण जेव्हा त्यांना ४ षटकात २७ धावांची गरज होती तेव्हा मला ते दडपणाखाली असल्याचे जाणवले.”

तिथेच मला वाटले की आपण सामन्यात पुढे जाऊ शकतो –

कर्णधार पांड्या पुढे म्हणाला, “इथून मला वाटले की आपण सामन्यात पुढे जाऊ शकतो. प्रत्येक गोलंदाजाने ज्या प्रकारे योगदान दिले, त्यामुळे मला कर्णधार म्हणून दखल देण्याची गरज नव्हती. मोहित शर्मा जेवढे क्रिकेट खेळला आहे, त्यात मला हस्तक्षेप करण्याची गरज नाही. त्याने माझे काम सोपे केले, त्याने त्याच्या योजनांनुसार अंमलबजावणी केली. शमी आणि मोहित उत्कृष्ट होते. बर्‍याच दिवसांनी खेळत असलेल्या जयंतने चांगली कामगिरी केली. नूरमध्येही उत्तम प्रतिभा आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After winning against lucknow hardik pandya revealed the discussion during the strategic timeout vbm