श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघासमोर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) ‘क्वालिफायर-१’ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान असणार आहे. यावेळी दोन्ही संघांचे लक्ष्य हे अंतिम फेरी गाठण्याचे असणार आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत शीर्ष दोन स्थानांत असल्याने कोणीही सामना गमावल्यास त्यांना अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
पंजाबने २०१४ मध्ये पहिल्यांदा ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले होते. सध्याच्या संघाचे कामगिरीचे श्रेय हे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि अय्यर यांच्या जोडीला जाते. दुसरीकडे, बंगळूरु संघाला अनेकदा बाद फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी ते जेतेपद मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. अय्यर- पॉन्टिंग जोडीने पंजाब संघात बरेच बदल केले आणि संघाचे लीगच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत चांगली कामगिरी केली. उपलब्ध खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याने संघ सध्या भक्कम दिसत आहे. मात्र, बंगळूरुच्या संघालाही कमी लेखण्याची ते चूक ते करणार नाही.
मुल्लानपूर येथील खेळपट्टी पाहता आता झालेल्या चार सामन्यांतील पहिल्या डावात केवळ एकदाच २०० धावा करता आल्या आहेत. गेल्या महिन्यात पंजाबने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १११ धावांचा बचाव केला होता. या सामन्यातील पराभूत झालेला संघ ‘क्वालिफायर-२’मध्ये गुजरात टायटन्स व मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या ‘एलिमिनेटर’मधील विजेत्या संघाशी खेळेल.
विराट, जितेश, पाटीदारवर भिस्त
बंगळूरुला लीगच्या अखेरच्या टप्प्यात काही खेळाडूंच्या दुखापतीची चिंता होती. मात्र, सध्यातरी ती दूर झालेली दिसत आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हा पूर्णपणे तंदुरुस्त होणे अपेक्षित आहे. टिम डेव्हिडही निवडसाठी उपलब्ध असेल. बंगळूरु गेल्या काही वर्षांपासून शीर्ष फळीतील फलंदाजांवर अवलंबून होती. मात्र, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मिळवलेल्या विजयात जितेश शर्माच्या योगदानानंतर बंगळूरुची ही चिंता मिटली असेल. त्याच्या खेळीमुळे संघाच्या इतर खेळाडूंचा आत्मविश्वासही दुणावला असेल. नेहमीप्रमाणेच फिल सॉल्टकडून आक्रमक खेळीची अपेक्षा असेल. विराट कोहली या हंगामात चांगल्या लयीत असून पंजाबविरुद्धही आपली हीच लय कायम राखण्याचा तो प्रयत्न करेल. रजत पाटीदारकडून संघाला चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत यश दयाल, नुवान तुषारा व भुवनेश्वर कुमार यांना आपली कामगिरी उंचवावी लागेल.
फलंदाजांकडून अपेक्षा
प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या सलामी जोडीने अय्यर व जोश इंग्लिस सारख्या खेळाडूंसाठी चांगले व्यासपीठ तयार केले. विजयवीराची भूमिका पार पाडणाऱ्या शशांक सिंहने सातत्याने आपल्या कामगिरीत सुधारणा आणली आहे. मार्कस स्टोइनिसनेही आपली क्षमता सिद्ध केली आहे. पंजाबसाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सन मायदेशी परतल्यानंतर त्यांची चिंता आणखी वाढली आहे. यान्सनने सुरुवातीला व सामन्याच्या अखेरीस निर्णायक षटके टाकली. त्यामुळे संघाला त्याची कमतरता जाणवेल. अष्टपैलू अझमतुल्ला ओमरझाई यान्सनची जागा घेऊ शकतो. लेग स्पिनर युजवेंद्र चहल बोटाच्या दुखापतीमुळे गेले दोन सामने खेळलेला नाही. त्यामुळे बंगळूरुकडून तो पुनरागमन करतो का, याकडे लक्ष राहील. हरप्रीत ब्रारनेही मिळालेल्या संधीत चुणूक दाखवली आहे. संघाच्या गोलंदाजीची मदार ही भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर असेल.