Fans Reaction On RCB Victory Parade Cancel: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला आहे. जे कोणालाच जमलं नव्हतं, ते रजत पादीदारने करून दाखवलं आहे. गेल्या १८ वर्षांपासून विराट कोहली ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण अखेर आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ च्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. मात्र या विजयानंतर एका निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे क्रिकेट चाहते गेल्या १८ वर्षांपासून आपल्या संघासोबत एकनिष्ठ राहिले आहेत. ३ वेळा हा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला, पण ट्रॉफी उचलता आली नव्हती. यावेळी संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी केल्यानंतर क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्जला एकतर्फी पछाडून या संघाने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर फायनलमध्ये पुन्हा एकदा पंजाबला पराभूत करत या संघाने आयपीएलची ट्रॉफी उंचावली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलची ट्रॉफी उंचावताच क्रिकेट चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे. या संघाच्या विजयाचा अहमदाबादसह संपूर्ण देशात आणि परदेशातही जोरदार जल्लोष झाला. तसेच होमटाऊन बंगळुरूत तर दिवाळी असल्यासारखं भासत होतं. विराटने, बंगळुरूत विक्ट्री परेड होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आपल्या आवडत्या संघाला ट्रॉफीसोबत पाहण्यासाठी चाहते बंगळुरूत तुफान गर्दी करणार होते. मात्र, ही ओपन बस परेड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
क्रिकेट चाहत्यांचा संताप
बंगळुरू शहर ट्रॅ्फीक पोलिसांकडून ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका युझरने लिहिले, ” विक्ट्री परेड रद्द? ट्रॅफीक काही तासांसाठी थांबवता येऊ शकतं. यात काहीच प्रॉब्लेम नाही.” एका युझरने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करून परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्याने लिहिले,”हे कसं शक्य आहे? आरसीबीने १८ वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. आम्हाला आनंद साजरा करण्याचा पूर्ण हक्क आहे.”
बंगळुरूत विराट कोहली आयपीएल ट्रॉफीसह येणार, म्हणजे तुफान गर्दी होणार. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून ओपन बस विक्ट्री परेड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विक्ट्री परेड दुपारी ३:३० वाजता विधान सौधा येथून सुरू होऊन चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत जाणार होती. पण ही परेड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता खेळाडू थेट एम चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार आहेत. इथे खेळाडूंचा सत्कार केला जाईल. ज्या चाहत्यांकडे पास असेल, केवळ त्यांनाच मैदानात प्रवेश दिला जाईल. बंगळुरूतील ट्रॅफीक पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.